Tuesday, February 08, 2022

कवेत माझ्या अखेरचे...

कवेत माझ्या अखेरचे...

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

चुकार भरल्या आसवापरी हळुच मग ओघळून जा

उमेदीच्या पंखबळावर, गाठशील प्रकाशास जेव्हा
सोडूनी पंख मागे जगा, खूशाल मग तू जळून जा

वसंत बहरला मनात माझ्या आठवफुलांचा तुझ्या
विरहवणवा शमविण्या माझा, एकदाच गं दरवळून जा

अभिमानाने वागवतो मी, घाव तुझे मनावरती माझ्या
सवय रहावी मजला त्याची, म्हणून तरी भळभळून जा

न कसली मागणी आयुष्यभर, अपेक्षा न कसली कधी बोललो
सहवेदना म्हणून एकदातरी, चितेवर माझ्या कळवळून जा

Wednesday, November 26, 2014

बरे वाटले....!


नकार-होकारावर कधीचे शब्दही होते अडले,
आसवांतून अखेर बोलून गेली... बरे वाटले....!


सव्वा रुपया, चार फुले... अन् नारळही नाही!
स्वस्तामधला सौदा..."माऊली"!... बरे वाटले...!


घाव केले हृदयावर त्यांनी... शब्दांचेच होते,
कट्यार नव्हती बगलेखाली... बरे वाटले....!


दारामध्ये ताटळलो कधीचे दोघे आम्ही,
श्वानाला तरी त्या भाकरी मिळाली... बरे वाटले...!


फुलली 'कमळ'दले अशी 'शरदा'त अचानक...
जादू कोणती रातोरात झाली?... बरे वाटले....!


असह्य होते शिवार जळते एकट्यानेच पहाणे,
मृत्यो!..तव साथ मिळाली....बरे वाटले...!


दुध-दह्याच्या अभिषेकांची 'सावळी' पाऊले,
आज माझ्या आसवांनीच न्हाली... बरे वाटले...!


नुसतेच पाहतो व्यवहार जगाचे 'अवि' उघड्या डोळा,
खदखद फक्त कवितेत निघाली...बरे वाटले...!


- अविनाश

Thursday, October 09, 2014

हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही.

कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!


तर सर्वप्रथम कथा. पुस्तकाची कथा ठिकठाक म्हणावी इतपत बरी आहे. पण कित्येक ठिकाणी प्रसंग-मांडणी मनावर पकडच घेत नाही.पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी. त्यामूळे थोडक्यात एखादा प्रसंग मांडून तो फुलवायच्या आधीच 'कट' म्हणायची घाई झालेल्या डायरेक्टरप्रमाणे प्रसंग संपतोही.


नायकाचे पात्र बर्‍याच ठिकाणी निर्बुद्ध आहे की काय असे वाटण्याइतपत अपरिपक्व दाखविले आहे. त्यात कॉलेजातले प्रेम, नायिकेला मिळवण्यासाठी नायकाची धडपड ई. तेच ते प्रसंग 2 states मध्ये उत्तम रितीने फुलवलेले असल्याने इथे गुंडाळल्यासारखे आणि काही वेळेस चक्क कंटाळवाणे वाटतात.
फक्त पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी आपण वाचत रहातो.

जिथे नायक नायिकांचीच पात्रे मनावर पकड घेऊ शकत नाहीत तिथे बाकी पात्रांविषयी काय बोलणार. पुस्तकातला रोमांसही तोचतोचपणा (आधिच्या पुस्तकातील) आल्यामूळे फारसा प्रभावी, उत्कट न वाटता उथळ वाटत रहातो.

तसे पहायला गेले तर काय नाही या 'स्क्रिप्ट' मध्ये. एक गंगाकिनारेवाला गरिब बिहारी गाव का छोरा, शिकण्यासाठी (?) दिल्लीतल्या कालेजात, नायिका एक बिगडे बडे बाप की 'थोडीशी' बिगडी लडकी. प्रेम, विरह, गाव आणि तिथले राजकारण, राजकुमार आणि राणीमाँ, बॉलीवूडछाप धक्का तंत्र, बिछडना आणि मिलना, प्रणय, पाठलाग, परदेशातले सिन्स ई.ई. फक्त ते प्रसंग 'फुलवायला' चेतनभाऊ कमी पडलेत.


वाचणार्‍यांचा उत्साह टिकून रहावा म्हणून इथे मुद्दामच कथेबद्दल जास्त लिहीले नाही.


तर...लोक पुस्तक वाचतील? चेतन भगतचे पंखे नक्कीच वाचतील (मी नाही का वाचले?). आणि इतर लोक कालांतराने सिनेमा पहातीलच की!

Wednesday, May 08, 2013

आजही...!


आजही...!

आजही...!

आपलेच आहेत ते ज्यांनी केलेत वार आजही
शब्द जयांचे घुसलेत हृदयात आरपार आजही

काय सांगू बरेवाईट तुझे, आज मी तुजला?
राहिला का तोच माझा अधिकार.... आजही?

समुद्राएवढी आहे की, आभाळाएवढी नक्की?
उमगत नाही मज या वेदनेचा आकार आजही

काय अप्रुप त्या धनाचे वाटणार सांगा?
'तोच' आहे मी तसाच निर्विकार आजही

विरुन गेली सर्व सुखे जरी गोड स्वप्नांपरी
त्या स्वप्नांचा मनात भरला बाजार आजही

सावलीही आज तुझी, 'अवी', साथ सोडू पाहते...
सोबतीला परी, 'तो', निर्गुण निराकार आजही...!

          ---- अविनाश पेठकर

Thursday, February 21, 2013

समाधान!

१९९७ साली, १० वी नंतर स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणी आता आपण कॉलेज कुमार झालो या भावनेने पोटामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या.

स. प. विद्यालयात दोनच वर्ष होतो मी, पण माझ्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत स. प. महविद्यालयाचा प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष असा फार मोलाचा वाटा आहे.

मी आणि माझा मित्र सुशांत दोघेही मध्यमवर्गीय घरांमधुन. म्हणजे खिशामधे एक बसचा पास आणि ५ किंवा १० रुपये जास्तीत जास्त. दोघेही स. प. कॅंटीनमधे दुपारी डबा खाण्यासाठी जमत असु. पण डबा खाता खाता कँटीनमधे दरवळणारा विविध पदार्थांचा सुवास आम्हाला आशाळभुतासारखा इतरांच्या ताटाकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडायचा. आपणही काहितरी घ्यावे असं खुप वाटायचं... पण ऐपतच नाही तर काय करणार! यावर आम्ही दोघांनी एक उपाय शोधुन काढला. आम्हाला कळलं की तिथे एक वाटी सांबार एक रुपयाला मिळतं. मग काय, रोज आळीपाळीनं मी आणि सुशांत एक वाटी सांबार मागवायचो आणी डब्यातली चपाती त्यात थोडी थोडी बुडवुन दोघे खायचो. काय स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद असायचा त्यात. (तुम्ही हसताय!...पण एक वाटी सांबारकी किमत तुम क्या जानो रमेशबाबू!!!) तसं ते सांबारही तितकंच स्वादिष्ट होतं.. किमान आमच्यासाठी तरी. दोनतीन महिन्यांतून एकदा एक 'बनवडा' घ्यायचो आणि तो दोघांत अर्धाअर्धा खायचो. त्या दिवशी आनंदाने दिवसभर आमची गाडी हवेत असायची.

अजुनही सुशांत, मी आणी आमच्या बायका (बायकोचं अनेकवचन 'बायका'च ना वो?) ते दिवस आठवून खुप हसतो आणी जुन्या आठवणींमध्ये बुडून जातो.

खरे तर स. प. महाविद्यालयाच्या बाहेर असलेलं S.S. Canteen हेच कॉलेज कँटीन नावाला साजेसं होतं. तिथं असलेल्या so called modern ललनांकडे पाहुन आम्ही दोघंही अचंबित व्हायचो. आणी दोघेही त्यांच्या नावाने शंख करायचो. काय करणार्..कोल्ह्याला द्राक्षे आंबट!.. हडपसरचा बस स्टॉप निलायम चौकात असल्याने आम्हाला रोज S. S. समोरुनच जावे लागायचे आणी खिसे चाचपुन कधी कधी गाडी आतमधेही वळायची आमची. त्यावेळी कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त कसं हादडता येईल याचं गणित चालायचं डोक्यात. एकदा हे गणित कायमचंच सोडवलं आम्ही दोघांनी मिळुन. S S मध्ये 'समोसा-पाव' नावाचा प्रकार मिळत असे. त्यासोबत चिंचेची आंबट-गोड चटणी आणि तळलेल्या मिरच्या आपल्या हातानेच घ्यायच्या असा शिरस्ता होता. मग काय, आम्ही भरपुर चटणी ताटात वाढून घ्यायचो आणी पावातून समोसा बाजुला काढुन ठेवून फक्त मिरची आणि पावाबरोबर सगळी चटणी सफाचट करायचो. त्यानंतर मग पुन्हा जाउन चटणी आणायची आणि या वेळी ती मिरची अन समोशाबरोबर खायची!!! तर अशा रितीने एकाच पदार्थाच्या किमतीत दोन पदार्थ खाल्ल्याचे समाधान आम्ही मिळवत असू.

खिशात पैसे नसल्याची कसर आम्ही मनात भरपुर 'समाधान' भरुन घेउन भरुन काढायचो. मागे वळून पहाताना आता वाटतं, स्वतःच स्वतःच्या मनाला समजावनं खुप सोपं होतं तेव्हा. एक वाटी सांबारानं हॉटेलमधे जेवल्याचं समाधान.... भरपुर चटणी-मिरची खाउन पोट भरल्याचं समाधान.... मनातल्या मनात 'एखादी'वर जीव टाकुन प्रेमात पडल्याचं समाधान... कधी मधे J M Road आणि Ferguson Road वर चकरा मारुन आपणही मॉडर्न असल्याचं समाधान.... आणि असंच बरंच काही. मुळात आईवडिलांनी पोटाला चिमटा काढुन आपल्या शिक्षणासाठी केलेली खटपट पाहून आपोआपच जबाबदारीनं आलेलं शहाणपण असावं या समाधानामागं. वडिल दहावी तर आई चौथी पास..पण त्यांनी आपल्या मुलांसाठी पाहीलेलं स्वप्न आणि त्याच्या पूर्ततेसाठी केलेली परिस्थितीशी लढाई हे नेहमीच आम्हा मुलांसाठी प्रेरणादायी होतं. आजही आई जेव्हा "माझी तीनही मुलं 'साप्टेर इंजीनर' आहेत" असं अभिमानानं सांगते तेव्हा, आईवडिलांच्या अपे़क्षांना आपण खरं उतरु शकलो या जाणीवेनं मिळणारं समाधान हे खरंच खुप मोलाचं असतं...'अलौकीक' असतं.

[मायबोली.कॉम येथे पूर्वप्रकाशित    http://www.maayboli.com/node/1869  ]




Wednesday, January 23, 2013

बाजार

-----------------------------------------------
बाजार

नकोच वाटे खेळावयाला जीवनाचा रे जुगार आताशा
साव ना उरला कोणी झाला, जो तो चुकार आताशा

बंद खिडक्या, बंदही  दारे, मीच  बंद माझ्याचमध्ये 
घुसमटल्या अशा मनास , राहिला ना शेजार आताशा

निर्व्याज प्रेमास का तोलती 'त्या' पैशांच्या तराजूने ?
गढूळल्या मनास नको वाटती, भावना हळूवार आताशा

दिवसाउजेडी काय काय हे पहावे लागते डोळा
घेतो नित्य मिटूनी डोळे, बरा वाटतो अंधार आताशा

पाप पुण्याचा हिशेब तुही ठेवू लागलास म्हणे देवा
तुझीच ना लेकरे मग का झालास, तू सावकार आताशा?

तूच्छ लेखून सर्व जगा, श्रेष्ठ म्हणूनी हे मिरविती
अशा नगांचा जगात 'अवि', भरला बाजार आताशा!

---------------------------------------------------------------------






Thursday, September 13, 2012

क्षण

क्षण

शांत शांत मंद आनंदी, तर कधी उदास क्षण काही
सत्य कधी तर कधी नुसते, आभास क्षण काही

मैफलीत खळखळणारे क्षण अल्लड निर्झर तुझ्यासवे
तुजवीन नुसती हुरहुर, जाळणारे, जीवास क्षण काही

थरथरत्या कातरवेळी हळूवार स्पर्श तुझे ते पांघरती
ग्रीष्मझळा आठवांच्या कशा, सोसती भकास क्षण काही

स्वार्थभरल्या कुरुक्षेत्री एकटाच अविरत मी झुंजतो
मनोरथांचे चाक काढण्या, मागतो, जीवनास क्षण काही

हिवाळा

हिवाळा

दवबिंदू पानावर एकटाच घाबरला पहा!
ऋतूने शालू नवा आज पांघरला पहा!

आळसावली झोप अजूनी गोधडीतच लोळते
वेळ चुकली कशी? सूर्य किती बावरला पहा!

काय वेगळी दुपार आज भासते नवी नवी
चुकार एक किरण धुक्यातून पाझरला पहा!

गोठली सृष्टी सारी अन आसमंतही गोठला
प्रितचाफा शब्दांतून हळूच मोहरला पहा!

भाव मनीचा माझ्या परी गोठला नाही सखे
आठवांनी रोम रोम माझा कसा शहारला पहा!

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

मायबोलीवरील (www.maayboli.com) सदस्यांच्या या स्नेहमेळाव्याचा वृत्तांत मी मायबोलीवर पूर्वप्रसिद्ध केला होता (http://www.maayboli.com/node/28429). माझ्या लेखनाच्या एकत्रिकरणासाठी तो ईथे प्रसिद्द्ध करीत आहे.

हा स्नेहमेळावा मुक्काम 'गंधर्व उपहार-गृह', पुणे येथे सकाळी ०८:३० ते ११:०० या वेळेत पार पडला!
--------------------------------------

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

----------------------------------------

टीप: खालील वृत्तांतात कुणाचा उल्लेख राहून गेल्यास तो अनुल्लेखाचा प्रयत्न नसून मा.बु.दो.स. (माझ्या बुद्धीचा दोष समजावा!)
कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत लिखाणास अक्षम्य उशिर झाला आहे याची मला जाणीव आहे. तरिही 'आपलेच' मायबोलीकर समजून घेतील अशी आशा.
---------------------------------------------

रविवारी भल्या पहाटे ८:३० ला ’रविवार ब्रेकफास्ट गटग’ साठी नाव नोंदणी करावी की करु नये अशा द्विधा मन:स्थितीत बराच वेळ काढल्यानंतर शेवटी एकदाचा मनाचा हिय्या करुन उपस्थिती नोंदवून टाकली. तरिसुद्धा मनामध्ये शंका-कुशंका चालूच होत्या. एकीकडे प्रथमच पुण्यातल्या गटगला मायबोलीकरांना भेटण्याची उत्सुकता तर दुसरीकडे इतक्या भल्या पहाटेची वेळ गाठता येईल ना, गाठली तरी नियमित भेटणार्‍या पुणेकर मायबोलीकरांमध्ये उपरा तर ठरणार नाही ना अशा शंका. शेवटी काही का होईना, सकाळचा ब्रेकफास्ट तरी करून येऊ इतकीच माफक अपेक्षा मनात ठेऊन पहाटे ७ चा गजर लावून शनिवारी मुद्दाम लवकर झोपलो. पण हाय रे दैवा, सकाळी सौ. प्रितीच्या जोरजोरात आवाजाने जाग आली. पहातो तर काय ७:१५ झालेले. तरी बरं की नोंदणी केल्याच्या दिवसापासून रोज ’गटगला जायचंय’ असा आमचा जप आमच्यापेक्षा आमच्या ’उत्तमार्धांगांनीच’ सिरीयसली घेतला होता आणि बहु प्रयत्नांती आमच्या ’चिरनिद्रेत’ व्यवधान उत्पन्न करण्याचे साहस त्यांनी केले होते. आधीच जरासा उशीर झाल्यामूळे आजच्या सुट्टीच्या दिवशी अंघोळीलाही सुट्टी द्यावी का, हे आमचे स्वगत ऐकून ’सौं’नी तीव्र निषेधाचा पवित्रा घेतल्याने आम्ही भर पहाटे पांढरे निशाण फडकवत विनाशर्थ माघार घेतली आणि मायबोलीकर माझ्या विनाअंघोळीच्या पवित्र व मनोहारी ’अवतारा’ला मुकले! स्मित

बरोब्बर ८ वाजता साग्रसंगीत तयार होऊन हडपसरहून दुचाकीला टाच मारून आमचे वारू दौडत ’गंधर्व’च्या दिशेने निघाले सुद्धा. पुण्यात अभावानेच दिसणाया मस्त मोकळ्या रस्तांचा मनापासून आनंद घेत बालगंधर्वला पोहोचलो आणि फार उशीर तर झाला नाही ना असे वाटून घड्याळाकडे पाहीले आणि विश्वासच बसेना.... घड्याळ चक्क ८:१० ची वेळ दाखवत होते. स्वत:च्या दुचाकीचालनकौशल्याबद्दल उर एकदम भरुन आला. गाडी ’गंधर्व’ समोर लावून टाकली आणि पुढचा वेळ कसा काढावा या विवंचनेत बालगंधर्वला दिसणाया गर्दिकडे वळलो. जरा जवळ जाऊन पहाताच खुप मोठा स्त्रियांचा घोळका बालगंधर्वच्या प्रवेशद्वारावर रांगेत उभा होता आणि एकदम भूत पाहिल्यासारखा माझ्याकडेच पहात होता. बायांच्या घोळक्यात एकदम हा बाप्या कुठून आला असा भाव त्यांच्या चेहयावर दिसल्याने ’ही गर्दी कशासाठी’ हा मनात आलेला आगाऊ प्रश्न मनातच ठेवून तिथून काढता पाय घेतला आणि ’गंधर्व’च्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर उभा राहून त्याच्या प्रवेशद्वारावर चालणाया घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून बसलो.

८:२५...८:३०...८:३२..................८:३३.......बरोब्बर ८:३४ वाजता गंधर्वच्या प्रवेशद्वाराजवळ एक ४/५ जणांचा ग्रुप दिसला तसा तिथे जाऊन घाबरत घाबरत ’मायबोली’ का? असे विचारले आणि सर्वांनी हसत होकार दिल्यावर मग मीही पुढे होऊन ओळख करुन दिली...’मी अविकुमार’ (नाम तो सुना ही होगा...हे मी मनातल्या मनात म्हटलं!). केदार, मनिष, फार-एन्ड, मयुरेश अशी नावे सांगत सगळ्यांनी हस्तांदोलन केले. तेवढ्यात त्या सर्वांच्या तोंडावर आश्चर्यमिश्रित भाव उमटल्याचे पाहून त्या कारणाकडे नजर वळवली तर २ व्यक्ती हसतमुख मुद्रेने आमच्याकडेच चालत येत होत्या. तर अशा प्रकारे अनिलभाई यांनी या गटगला धावती भेट देऊन आश्चर्यचकीत केले. त्यांच्याबरोबरील दुसरी व्यक्ती म्हणजे मायबोलीकर श्री. विवेक देसाई असल्याचे समजले. तेवढ्यात एक दुचाकी आमच्या पुढ्यात येऊन थांबली आणि त्यावरील मुलीने आमच्याकडे हात हलवीत ’हाय’ केले. परंतू तोंडाला ’खास पुणे इश्टाईल’ने रुमाल बांधला असल्याने कुणालाच ओळख पटेना आणि सगळे गोंधळून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. गडबड लक्षात आल्याने तिने झटकन तोंडावरील रुमाल बाजूला सारला आणि ’नीधप’ कार्यक्रम स्थळी अवतरल्या. तेवढ्या वेळात अनिलभाई झटकन आपल्या कार मधे जाऊन नवीन मायबोलीचा चहासदरा घालून अवतरले. पुन्हा ओळखीचा कार्यक्रम झाला आणि खास अनिलभाईंच्या विनंतीवरून एक लहानसे ’फोटोशूट’ही तिथल्यातिथे पार पडले.

नीधप ने आदल्या दिवशीच गंधर्वमधली २० आसने राखीव करुन ठेवल्याने आसनांसाठी धावाधाव करावी लागली नाही आणि सर्व जण एक एक करीत स्थानापन्न झाले. मी केदार आनी कांदापोहेच्या (मधल्या काळात केप्याचे वाजतगाजत आगमन झाले होतेच) मधली अशी मोक्याची जागा पटकावली जेणेकरून सर्व चर्चांमधे शाब्दिक नसला तरी ’ऐकीव’ सहभाग घेता येईल. हळू हळू एक एक मायबोलीकर कार्यक्रमस्थळी अवतरू लागला तसतसा ओळखपरेड आणि गप्पांना रंग चढू लागला. मी सुध्द्धा आपल्या वकूबाप्रमाणे मधूनच गप्पांमधे उगाच एखादं वाक्य टाकून हिःही हसत होतो. मधेच माझ्या ऊसगावातून कायमस्वरुपी परतल्यानंतरचे अनुभव याविषयीच्या एका वाक्याने केदार बिथरला आणि पुन्हा असं घाबरवू नकोस अशी विनंती करून मोकळा झाला. मी मात्र मनातल्या मनात कसं फसवलं म्हणत हसत बसलो. तेवढ्या वेळात तिथे शैलजा, स्वाती व देव, रूमा, श्यामली, हिम्सकूल, किरू, आनंदसुजु, आनंदमैत्री, बागुलबुवा, देवा सुध्द्धा येऊन पोहोचले होते आणि जोरदार कल्ला चालू झाला होता. नीलवेद, इंद्रा, कौतुक शिरोडकर हे सुध्द्दा आल्याचे कळाले पण नक्की कोण आणि कुठे होते ते मला शेवटपर्यंत कळाले नाही हो. आणि याची रुखरुख अजूनही मनात आहे.

तेवढ्यात देवा आणि केदार हे साईडप्रोफाईलने सारखेच दिसतात असं कोण तरी म्हणाले म्हणुन मग आधी देवा कोण हे शोधून काढ, मग उगाच त्याच्याकडे ’तो साईड प्रोफाईल’ कधी देतोय याची वाट बघ, मग केदार चा साईड प्रोफाईल बघ, मग ’अरे हो..खरंच की’ याचा साक्षात्कार होऊन खूश हो असे उद्योग मी ’उपमा’ खाता खाता चालू ठेवले. बागूलबूवाचे फोटोसेशन सुद्धा जोरदार चालू होते. ते फोटॊ काढायला लागले की हातातला तोंडापर्यंत नेलेला उपम्याचा चमचा पटकन खाली कर, केप्याने मागवलेल्या उडिदवडयाला कुणीही वाली नसल्याचे पाहून त्या उडिदवड्याला ’उडवा’यचा प्लॆन कर आणि केपीराव तेवढ्यात तेथे उगवल्याने (किंवा कडमडल्याने म्हणा) उडदाऐवजी मूग गिळून गप्प बस असे उद्योगही गप्पा ऐकत असताना माझे एकीकडे चालूच होते.

गप्पांचे विषयही अहाहा...काय वर्णावे..... अगदी वैश्विक..... बाराकरांचे गटग, झक्की, औरंगाबादचे गेस्ट हाऊस आणि त्यातील एकंदरित (अ)सुविधा, वैभवाचा आदल्या दिवशीचा गझल कार्यक्रम ’शब्द झाले मायबाप’, त्या कार्यक्रमानंतरचे कार्यकर्त्यांचे गटग, शिकागो अधिवेशन आणि तेथल्या घडा’मोडी’!, ऊसगावातून भारतात आणण्याजोग्या वस्तू, मायबोलीवरील काही मायबोलीकर आणि त्यांच्या लिखाणाचा दर्जा ई. ई. अशा प्रकारच्या आणि इतरही अनेक विषय माझ्या ’ग्यान’ सागरात भरच घालून जात होत्या. ’नीधप’नी आणि ’केदार’नी एव्हाना गप्पांची वरची पट्टी पकडली होती आणी या सर्वांचा कळसासाध्याय म्हणजे उशिराने उगवलेल्या ’ललीता-प्रीती’. त्या अगदी थोड्या काळासाठी तिथे आल्या आणि सर्वांना आपल्या दर्शनाने पुनीत करून रवाना झाल्याही. आम्ही आपले पहातच राहीलो.

एव्हाना अनिलभाईंना पुढे गोव्याला जायचे असल्याने ते सर्वात आधी सटकले होते. त्यानंतर थोड्यावेळाने मुंबईला जाणारे ’पुणेकर’ निघाले. मग हळूहळू एकेक जण सटकू लागला. तितक्यात आम्हा सर्वांचा विरोध न जुमानता केदारने संपूर्ण उपहाराचे बील अदा केले. आणि घड्याळातले १०:३० बघत आम्हाला पण निघायचे वेध लागले. पुन्हा एकदा ’गंधर्व’ बाहेर एक उर्वरीत लोकांची लहानशी मैफल उभ्या उभ्या जमवून साधारन ११:०० वाजता आम्ही सर्व जण पुन्हा भेटन्याचे ठरवत एकमेकांचा निरोप घेतला.

---

क्षणचित्रे:

१. नीधपने इतक्या मोठ्याप्रमाणावर मायबोलीकरांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल तिचे हार्दिक आभार.
२. नीधपला एके ठिकाणी तीचा एक लेख वाचल्याची मी आठवण करुन दिली आणि उपनिर्दिष्ट लेख फार चांगला असल्याबद्दल मी तीला सांगताच ’केदार’ मात्र ’कशी जिरली ’नी’ ची’ अशा अविर्भावात खूश झाला.
३. केदार आणि मी एकाच कारखान्यात पाट्या टाकत असल्याचे निदर्शनास आले.
४. मंजात्या हे पुण्यातलं फार लाडकं व्यक्तीमत्व असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक थोड्या वेळाने त्यांच्या नावाचा उद्घोष चालू होता.
५. केदार हे बर्याचशा आर्थिक बाबीतले उत्कृष्ट जाणकार व सल्लागार आहेत. आणि फुकटात सल्ला देण्यासही ते नेहमी तयार असतात...आणि फुकटात ’खिलवण्यासही!’
६. गंधर्व मधील ’कटलेटस’ फारसे न आवडल्याने त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आले आहे.
७. माझ्या मायबोलीवरील एकंदरीत ७ वर्षाच्या कारकिर्दित(!)ला हा देशातला पहिला गटग आणि एकंदरीत दुसरा गटग होता. (हे फक्त क्षणचित्रांची एकूण संख्या वाढवण्याच्या दृष्टीने लिहिले आहे, यावर कोणत्याही खवट/खारट/तिखट प्रतिक्रियांना अनुल्लेखाने मारण्यात येईल!)
८. बर्‍याचशा गप्पा आणि त्यांचे विषय माझ्या कानांच्या टप्प्यांतून आणि बुद्धीच्या कुवतीतून राहून गेले आहेत याची मला खात्री आहेच. तरी उपस्थित मान्यवर ते सर्व इथे नक्कीच टंकतील याची खात्री मज पामरास असल्याने इतक्या उशिरानेसुद्धा वृत्तांत टाकण्याचे धाडस करीत आहे!


Wednesday, July 28, 2010

का?

हि नविन कविता तुमच्यासाठी! प्रतिसाद जरुर द्या! (मोठ्या आकारात पहाण्यासाठी कवितेवर क्लिक करा)

Tuesday, December 22, 2009

सोबती

आताशा आरशात पाहाणं मी बर्‍याचदा टाळतो, कारण...
समोर काय दिसणार याचा चोरटा हिशेब,
मनाने आधीच कुठेतरी करुन ठेवलेला असतो...

तरीही व्हायचं तेच होतं,
नेहमीच्याच सवयीनं, अनावधानानं
आरशाकडे लक्ष जातं...
आणि मग समोर
नेहमीचंच चित्र उभं रहातं...

दिसतोच शेवटी तो वठलेला एकलकोंडा वृक्ष...
एकेकाळच्या भव्यतेच्या खुणा
अंगाअंगावर मिरवणारा...
आणि आता स्वतःच्या अस्तित्वासाठीच
केविलवाणी झुंज देणारा...

त्याच्या अंगाखांद्यांवर वाढलेल्या पक्षानंही
आता दुसरीकडे बिर्‍हाड मांडलंय..
आणि त्यानंही एव्हाना सवयीनं,
ते हताशपणे स्विकारलंय....

खुद्द धरणीमातेनंच झिडकारल्याचा घाव मात्र
त्याच्या उरल्यासुरल्या फांद्यांतून,
शेवटर्यंत सलणार बहुतेक...

घायाळलेलं मन त्याचं,
एकाकीपणाच्या सरणावर,
शेवटपर्यंत जळणार बहुतेक...

आणि,
तरीही सोबतीच्या आशेने,
अस्तित्वाच्या मृगजळामागे तो,
शेवटपर्यंत पळणार बहुतेक....
........
...........

आताशा आरशात पाहाणं मी कटाक्षानं टाळतो, कारण...
जर तो वृक्ष पुन्हा दिसलाच नाही, तर....
माझे अस्तित्वच उन्मळून पडेल,
सोबत्याविना सरणावर एकाकी असल्याच्या जाणीवेने......
सोबत्याविना सरणावर एकाकी असल्याच्या जाणीवेने......

Tuesday, May 19, 2009

धमाल टेक्सास ए.वे.ए.ठि. वृत्तांत - एक संस्मरणीय अनुभव!

ए.वे.ए.ठि. = एकाच वेळी एकाच ठिकाणी.
मायबोली = मा.बो. = www.maayboli.com
दिवसः मिती वैशाख शुक्ल ८ शके १९३१, शनिवार दिनांक २ मे २००९ रोजी
ठिकाण - ह्युस्टन (टेक्सास)
-------------

जसजसं ह्युस्टन मागे पडत होतं तसतसे मनातले आठवणींचे तरंग अधिकाधिक गहिरे होत होते. टेक्सासबाफ ला आम्ही सगळे श्रावणबाफ म्हणतो. श्रावणात जसे 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असतं, तसंच टेक्सासबाफवर कधी पोस्टांचा पाऊस तर कधी मंदारची 'सुप्रभाति' पोस्ट सोडून काहीच नाही, असा श्रावणी ऊनपावसाचा खेळ चालू असतो. म्हणूनच ए.वे.ए.ठि. ला 'मेंबरां'च्या उपस्थितीचा दुष्काळ जाणवण्याची शक्यता गृहित धरुन निघलेला मी, टेक्सासकरांच्या अविश्वसनीय प्रतिसादाच्या, आदरातिथ्याच्या, अवखळपणाच्या, अगत्यशीलतेच्या अशा अगणित आठवणी मनात साठवूनच परतीच्या प्रवासाला लागलो होतो......

अरे अरे मंडळी, लगेच उठून जायला नका लागू हो... सांगतो की बैजवार तुम्हाला सगळं...जरा या इकडे असं टेक्सासबाफवर.... हां अस्संऽऽ... हाच तो बाफ जिथे एक आठवड्यापूर्वीपर्यंत गटगच्या चर्चा अगदी चवीनं चघळल्या जात होत्या. काहीजणांना वाटलंही असेल कि हे सगळं नुसतं बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.. त्या 'काही'जणांमधलाच मी पण एक होतो. पण जसं माझं देशात कायमचं परतण्याचं नक्की झालं तसं वाटलं की एकदातरी गटग झालंच पाहिजे. मग भले २ सदस्य का उपस्थित असेनात. आणि मग साशंक मनाने का असेना, पण बीबीवर जाहीर करुनच टाकलं की येत्या सप्ताहांताला (शनिवार, दि. २ मे) मी ह्यूस्टनमुकामी ए.वे.ए.ठि. साठी येतो आहे.

आता मंडळी तुम्ही म्हणाल, 'हे ह्यूस्टनच का रे बाबा ठरवलंस?'. म्हणा की. तर त्याचं असं आहे की टेक्सासबाफवर मुख्यतः दोन ठिकाणचे मायबोलीकर उपस्थित असतात... ह्यूस्टन आणि डल्लास. मी आणि सीमा असे दोघे डल्लासचे सदस्य सोडल्यास बाकी सगळी मंडळी ह्यूस्टनची.... मंदार, आशी, साज, रिमझिम. मग कमीत कमी एकातरी महानुभावाची उपस्थिती राहिल असा सुज्ञ (!) विचार करुन ह्यूस्टन नक्की केलं हो!

तर हे असं ए.वे.ए.ठि. जाहिर होताच टेक्सासवर पोस्टांचा हलकासा पाऊस सुरु झाला. आशी आणि मंदारनं ही कल्पना लगेच उचलून धरली तसा थोडा धीर आला. बाफवर चविष्ट (आणि पाणचट!) गप्पांना ऊत आला. मी आणि मंदारनं प्रस्तुत केलेला चमचमीत जेवणाचा बेत आशीनं माझ्या अल्सरचं निमित्त करुन असा काही हाणून पाडला की ज्याचं नाव ते. त्याच वेळी आशी मुगाच्या खिचडीचा कट करते आहे असं दिसताच मी जोरदार विरोध करुन त्या 'कटा'ची आमटी करुन टाकली. माझ्या भाकरीच्या फर्माईशीला आशीनं ती कोकणात कशी एका दिवसात ५० भाकर्‍या करते याचं रसभरीत उत्तर दिल्यानं, ए.वे.ए.ठि. च्या दिवशीच्या एकंदरीत प्रतिकूल घटनांचा ल्.सा.वि. काढूनही माझ्या वाट्याला २ तरी भाकर्‍या येतील अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत करुन घेतली. समजूतच म्हणा ती. ऊसगावात भाकरी पहायचंही नशीबात नसलं तर खायच्या गोष्टी करुन काय उपयोग, हे माझ्या 'भाबड्या' मनाला कसलं समजतंय! असो. मंदारच्या डोक्यावर पुरणपोळीचा भार टाकायचा मी आणि सचिनने प्रयत्न करताच असा काही गायब झाला की स्वारी दुसर्‍या दिवशीच 'सुप्रभाता'ला उगवली!

या पु.पो. च्या (पु.पु.च्या नव्हे! संबंधितांनी गैरजमज करुन घेऊ नये) आणि मुगाच्या गरमागरम चर्चेवर मुग गिळून गप्प बसतिल ते मा.बो.कर कसले. तर या ही चर्चेत वेळोवेळी तेल आणि कधी कधी पाणीही ओतण्याचे महान कार्य सचिन, रुनी, उपास यांनी यथासांग पार पाडले.

होता होता शुक्रवार उजाडला. पण इच्छूकांचा आकडा काही पुढे सरकेना... मी, आशी आणि मंदार. सीमाचं लवकरच देशात सुट्टीवर जायचं घाटत असल्याचं तिनं मला ई-पत्रातून कळवलं तेव्हा तिला ए.वे.ए.ठि. ला उपस्थित रहाण्याच्या माझ्या आग्रहावर 'सीमा' आल्याचं मला जाणवलं आणि एक उपस्थित गळाला. राहाता राहीले रिमझिम आणि साज. रिमझिमची परिक्षा सुरु असल्याने तशीही तिची बाफवरची पोस्टांची उपस्थिती मूसळधारहून 'रिमझिम्'पर्यंतच सिमीत झाली होती. साजचं कन्यारत्न 'ईशानी' हिच्या तब्येतीच्या तक्रारी चालू असल्याने ती सुद्धा साशंकच होती. पण मंदार आणि आशी त्यांच्या ऊपस्थितीबद्दल बरेच ठाम असल्याने मी अजूनही आशावादी होतो.

तर मंडळी, अशाप्रकारे शनिवारी पहाटे ६ वाजता निघून मी आणि माझा मित्र भूषण ११-१२ वाजेपर्यंत ह्यूस्टनला पोहोचायचं असं ठरलं. 'ठरलं एकदाचं' असं म्हणा हवं तर!

पहाटे ५ चा गजर घड्याळात लावून मी झोपलो खरं पण उशिरापर्यंत झोपण्याची वाईट सवय ईथेही आडवी आली. पहाटे बराचवेळ आकांडतांडव करून घड्याळाच्या गजराने आमच्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि बिचारा शांत झाला. ईकडे माझे डोळे 'भल्या पहाटे' ७ वाजताच ऊघडले आणि शॉक लागल्यासारखा मी बिछान्यातून टुनकन ऊडालो. तिकडे भूषणमहोदयांचीही अशीच काहिशी अवस्था होती. शेवटी ८ वाजता धावत पळत तयार होत ह्यूस्टनच्या दिशेने प्रस्थान ठेवले...... बाहेर थंड हवा, ढगाळ वातावरण आणि गाडीमधे आदल्या रात्री नव्यानेच बनवलेल्या सीडीमधली वाजणारी सुमधूर गाणी यामूळे मन कसं एकदम उत्साही होतं.

तर मंडळी, अशा प्रकारे गाणी ऐकत, गप्पा मारत आमचा प्रवास गटगच्या दिशेने पुढे सरकत होता!

आदल्या दिवशी फोनवरील संभाषण अर्धवट सोडून पळालेल्या मंदारला साधारणतः सकाळी १० वाजता जाग आली म्हणून की काय, माझा भ्रमणध्वनी किणकिणला आणि मंदारभाव फोनवर अवतरले. घरातल्या पाहूण्यांचे कारण पूढे करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आमचे प्रवासाचे हालहवाल जाणून घेऊन स्वारी गायबली.

मस्त रमत गमत, गप्पा मारत, रस्ता चुकत, गाणी ऐकत आम्ही ह्यूस्टनजवळ येऊन पोहोचलो तसं आधी ठरवल्याप्रमाणे आशीला फोन केला. पण ४-५ वेळा प्रयत्न करुनही उत्तर काही मिळेना तेव्हा 'अजून एक मेंबरानं डच्चू दिला की काय' अशी शंका मनात चमकून गेली. पण सुदैवाने, घरच्या फोनऐवजी भ्रमणध्वनीवर प्रयत्न केल्यावर फोन उचलला गेला आणि...........आशी तिकडून 'आशी'काही बरसली कि बस्स्...ती म्हणे माझा फोन सकाळपासून ट्राय करत होती आणि मीच उचलत नव्हतो. तिने 'आवाजी संदेश'ही ठेवला होता म्हणे माझ्यासाठी. पण माझ्या भ्रमणध्वनीतून तर कसलाच आवाज आला नव्हता. तेव्हा तिच्याकडून माझा भ्रमणध्वनी क्रमांक वदवून घेतल्यावर खरी 'ग्यानबाची मेख' माझ्या ध्यानात आली. अस्मादिकांनी घाईघाईत 'ध' चा 'मा' केला होता. क्रमांकामध्ये ५ च्या ऐवजी २ लिहिण्याची एक 'लहान'शी चूक आम्हाला भोवली होती. असं हसायचं नाही काही मंडळी, चूक माणसाकडुनच होते ना? (बाईमाणसाकडून चूक होते असे म्हणण्याची हिंमत अजून तरी माझ्यात आलेली नाहिये!)

पण तशाही परिस्थित कोणा पामराच्या फोनच्या 'आवाजी संदेशात' आशीने 'आवाज' काढला असेल आणि तो ऐकून सदर व्यक्तिचा चेहरा कसा पहाण्यालायक झाला असेल याची कल्पना करुन येणारे हसू मी महत्प्रयासाने आवरले. तो पर्यंत आशीबाई बर्‍याच शांत झाल्या होत्या. त्या त्यावेळी स.कु.स्.प. बँकेत गेल्याचे कळल्याने तिकडेच भेटून पुढच्या योजना ठरवूयात असे ठरले म्हणून आम्ही बँकेच्या दिशेने निघालो. मधल्या वेळात मी साज ला बर्‍याचवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन सरळ सरळ बंद होता! त्यामूळे 'साज काही येत नाही आज' असे वाटले.

ठरल्याप्रमाणे येऊन पोहोचलो आणि त्या नंतर दोनच मिनिटांत आशी, त्यांचे उत्तमार्धांग श्रीयुत आशिष आणि सुपुत्र 'अर्णव' यांचे आगमन झाले. मला तेवढ्या वेळात जरा फिरकी घ्यावी असे वाटून गेले म्हणून भूषण ला 'अविकुमार' बनण्यास सांगून मी स्वतः 'भूषण' बनलो. त्या प्रमाणे आम्ही आमच्या ओळखी करुन दिल्या. त्यामूळे माझ्याकडे पुर्णतः दूर्लक्ष करुन आशी भूषणलाच मंदार आणि बाकी सगळ्यांबद्दल विचारायला लागली. थोड्याच वेळात भूषण साहेबांना ते नाटक वठवणे अवघड जाऊ लागले आणि मग मी 'कशी गम्मत केली'च्या 'अवि'र्भावात खर्‍या अविची (म्हणजे अस्कादिकांची हो मंडळी!) ओळख करुन दिली. आशिषला आम्ही खरे तर पहिल्यांदाच भेटत होतो पण तरिही त्याच्या लाघवी आणि मोकळ्या स्वभावामूळे आम्ही सगळे खूप पुर्वीपासूनची ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारायला लागलो.

आता मुख्य काम होते ते मंदारशी कुठे आणी कसे भेटायचे ते ठरवणे. त्या प्रमाणे मंदारला फोन केला तर पठ्ठ्याने रिमझिमलाही फोनवर घेतले होते. ती सुद्धा सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक होती आणि परिक्षा असूनही वेळात वेळ काढून येता येतं का ते पहात होती. फक्त तिचे घर सर्वात दूर असल्याने कोणतेतरी मध्यवर्ती ठिकाण ठरवावे लागणार होते. हे ऐकूण मला आणखी हूरुप आला. आणखी एक मेंबर वाढला की हो मंडळी! आता फक्त साज राहिली होती. मी पुन्हा तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण.. व्यर्थ.

दरम्यान चि. अर्णव आम्ही उभे असलेल्या दुकानाच्या स्वयंचलित दरवाजाची कार्यक्षमता वारंवार तपासून पहात असल्याचे आशिषच्या लक्षात आल्याने इथून लवकरच काढता पाय घ्यावा असे त्याने आम्हाला सूचवले. एव्हाना सर्वानुमते असे ठरले होते की, मी, भूषण, आशी, आशिष आणि मंदार आधी कोणत्या तरी 'हाटिलात' भेटून दूपारचे भोजन उरकून घ्यावे आणि मगच रिमझिमला भेटायला एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जावे. त्या नुसार आम्ही 'क्ले पॉट' नामक हाटिलाकडे मोर्चा वळवला. मंदारला यायला थोडा वेल होता. चि. अर्णवला भूक लागली असल्याने त्याला आधी भोजन करवले पाहीजे या हेतूने मंदारची वाट पहात बाहेर थांबलेले आम्ही सर्व आतमध्ये गेलो खरे, पण आतल्या पदार्थांच्या घमघमाटाने आमच्या पोटातल्या उंदरांच्या उड्यांचं अनुक्रमे कावळ्याच्या कावकावमध्ये आणि लगेच वाघाच्या डरकाळ्यांमधे रुपांतर झाले. मंदार तर अजूनही आला नव्हता. पण तितक्यात.. आशिषला एक नामी युक्ती सुचली बरं का मंडळी!..मंदार येईपर्यंत आपण फक्त स्टार्टर्स चालू करुयात म्हणजे मेन कोर्स चल्लू न केल्याने योग्य ते औचित्य साधले जाईल! .....आणि मग...पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही स्टार्टर्सवर तुटून पडलो!

यथावकाश म्हणजे ५ मिनिटांतच मंदार आणि त्यांचे उत्तमार्धांग सौ.अपर्णा यांचे आगमन झाले. आम्ही 'नामांतराची' नेहमीची यशस्वी युक्ति मंदारवर आजमावण्याचा प्रयत्न केला पण... पण तो साफ अयशस्वी ठरला. मंदारने मला बरोब्बर ओळखले. मी कधी काळी माझा 'फोटू' मा.बो. वर लावला होता तो पाहिल्याचे त्याला पूसटसे आठवत होते म्हणे!

मग काय...जेवणाबरोबरच गप्पांना उधाण आले. मंदार पूर्वी बा.रा.च्या ए.वि.ए.ठि.ला हजर असल्याचे कळले. साहजिकच गप्पांचा रोख झक्की, विनय, मृ. ई. कडे वळून आला. तसेच बोलण्याच्या ओघात उपस्थित बरेच जण हे 'विशिष्ठ शहरातले' किंवा जिल्ह्यातले असल्याचे स्पष्ट झाले. मधेच मंदारला पु.पो.ची आठवण करुन दिल्यावर 'करुण' चेहर्‍याने' आणि पु.पु. बाण्याने त्याचे उत्तमार्धांग आजूबाजूला नाही याची खात्री करुन घेत, ती फर्माईश थेट सौ. अपर्णाकडेच करण्याचा 'भयानक' प्रेमळ सल्ला दिला. स्वतःचा जीव वाचवून माझा जीव धोक्यात घालण्याचे मंदारचे कॄत्य मला बिलकूल रुचले नाही आणि म्हणूनच मी 'मला पु.पो. फारशी आवडत नाही' असे सांगून कशीबशी वेळ मारुन नेली. स्वतः मरण्यापेक्षा वेळ मारलेली बरी... नाही का हो मंडळी! मधेच मंदारने त्याला मिळणार्‍या सुट्ट्या या विषयाचे गोडवे गाऊन सगळ्यांची गोड खीर आंबट करुन टाकली. आणि बदल्यात तीळ - पापडही खाऊ घातले.

गप्पा मारता मारता असेही कळले की, मी आणि मंदार दोघेही अजून महिनाभरात एकाचवेळी पुण्यात असू. तेव्हा पु.पु.बरोबरही एक ए.वे.ए.ठि. करता येईल. याबाबतीत मंदार थोडा साशंक होता.त्याचं म्हणनं पदलं की आपण काय झक्कीकाकांसारखे उत्सवमूर्ती (पक्षि सेलिब्रेटी) थोडेच आहोत? पण मी बराच सकारात्मक होतो... अजुनपर्यंतचा अनुभव आणि काय... म्ह्टलं बघु...आले तर ठीक नाही तर......आपण दोघे आहोतच की.. दोघांचेच ए.वे.ए.ठि. करुन टाकू... हा.का. ना. का.!

गप्पांच्या नादात जेवण जरा (?) जास्तच झाले. साधारणतः दुपारचे ३ आणि पोटाचे १२ वाजत आले होते. म्हणून मग पुढचा कार्यक्रम ठरविण्यासाठी मंदारने रिमझिमला फोन लावला. मग मी पण साजला पुन्हा संपर्क करण्याचा प्रायास करुन पाहिला. आणि..... अहो आश्चर्यम! फोन चक्क दस्तुरखुद्द साजने उचलला. चुकीचा फोन नंबर दिल्यामुळे आशीने दिलेला आहेर मी साभार साज पर्यंत पोहोचवून टाकला. तिच्याकडून कळले की कन्यारत्नाची तब्येत अजूनही नरमच असल्याने तिचे येणे अवघड आहे. तरिही, रिमझिमला भेटण्यापूर्वी एकदा साजकडे जाऊन यावे असे ठरल्याने आम्ही आधी आशीच्या घरी आणि नंतर साजकडे जायचे नक्की केले. खाणावळीचे सर्व बिल आमच्या आग्रहाला न जुमानता आशिष ने देऊन टाकले आणि आमचा मोर्चा आशीच्या घरी जाऊन विसावला.

आता आशिष , मंदार, आणि अपर्णा यांना चहाची चांगलीच तल्लफ आली होती. त्यामूळे वेळ वाचवण्यासाठी साजकडे गप्पा मारता मारता चहाची फर्माईश करण्याचे ठरले आणि आम्ही निघायची तयारी केली. पण सगळेजण आपल्या घरी आले आणि काहीही न घेता निघाले हे आशिषच्या मनाला पटेना. त्यामुळे मग नाईलाजाने (!!!) आशीने अल्पोपहार पेश केला पण सगळ्यांची पोटं तुडुंब भरली असल्याने आशिषचे मन राखण्यासाठी म्हणून थोडंसं काहिबाही पोटात ढकलून सगळे जण साज कडे निघालो.

साजचं अपार्टमेंट म्हणजे एक मोठा भूलभूलैयाच होतं. किंवा अली बाबाची गुहा म्हणा. लहानपणीच्या चोरपोलिस (वेगवेगळ्या खूणा ओळखून चोर पकडणे) खेळाची तीव्रतेने आठवण झाली. चालत चालत एका बोळातून दुसर्‍या बोळात घर शोधताना सगळ्यांनाच मजा यायला लागली होती. मला एखादं म्यूझियम पहात असल्याचा भास झाला. एका ठिकाणी तुरुंगाला असतात तसे उभे बार लावले होते आणि त्या बारकडे जाणारा बाण दाखवून घरावी दिशा प्रदर्शित केली होती. आत या बारमधून कसं जायचं असा प्रश्न मंदारच्या बालसूलभ बुद्धीला न पडतो तरच नवल! पण तेवढ्यात मी दुसरा रस्ता शोधून काढला म्हणून बरं नाही तर मंदारच्या आग्रहाखातिर त्या बार मधून मधून जाव लागलं असतं सगळ्यांना. सगळे जण गेलेही असते हो बारमधून आरामात, पण मला माझ्याच बाबतीत शंका असल्याने मी पटकन दूसरा रस्ता शोधण्यावर भर दिला होता. असो. करता करता शेवटी शेवटच्या बोळात येऊन पोहचलो. तर मंदारची बालसुलभ बुद्धी परत जागृत! "शेवटच्या बाणापर्यंत पोहोचल्यावर 'कसं फसवलं' असं लिहिलेलं आढळलं तर काय?". मी आपलं असोशीनं तिकडं दुर्लक्ष करत (खरं तर मनातल्या मनात हसू आवरत) पुढे झालो.

दरवाजावर आवाज केल्यावर दरवाजा एका लहानशा मुलीनं उघडला. मनात म्हटलं की, अरे साजची मुलगी बरीच मोठी आहे की!. पण मग हिच 'साज' असं समजल्यावर 'मुग' गिळून गप्प बसलो. सगळी कंपनी घरात स्थिरस्थावर झाल्यावर 'ओळखा पाहू कोण आम्ही?' हा खेळ खेळण्यात आला. राज्य अर्थातच साजवर होतं. पण साजनं जवळजवळ सगळ्यांना बरोब्बर ओळखलं... सगळे जण बसलेच होते तसे..... जवळजवळ!!! मला तर साजनं आरामात ओळखलं कारण तीने माझ्या ऑर्कूटवरच्या प्रोफाईलला आधीच भेट देऊन ठेवली होती. अस्सं आहे होय ते.. बऽऽरं बऽऽरं....!!!

आधी ठरवल्याप्रमाणे साजला चहाची फर्माईश केली तिने सगळ्यांना खीर खाण्याचा प्रेमळ आग्रह केला. आम्ही तो आग्रह आमच्या तुडूंब भरलेल्या पोटांच्या काळजीने साभार परतवून लावला. आणि रिमझिमकडे जायला उशिरही होत असल्याने जरा घाई करावी लागणार होती. तेवढ्यातच साजचे उत्तमार्धांग श्रीयुत परागचे आगमन झाले. सगळ्यांशी ओळखी करुन घेत परागही गप्पांमधे मिसळून गेला. पण आशिष आणि मंदारला चहाची तल्लफ काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती.... म्हणून पुन्हा चहाचा आग्रह्....त्यावर साजचा पुन्हा खिरीचा आग्रह....त्यावर पुन्हा सगळ्यांचा साभार नकार.. पुन्हा रिमझिमसाठी घाई...!!
शेवटी रिमझिमला भेटल्यावरच चहा घेऊ असं ठरलं. पराग आणि साज यांनी चर्चा करुन आमच्याबरोबर यायचा अनपेक्षित आणि आनंददायक निर्णय घेतला आणि साज कु. ईशानीची आवराआवर करायला पळाली. आवराआवरी करुन १०-१५ मि. मध्ये आम्ही सगळे निघालो... बरोबर चहासाठी तरसलेले अतृप्त आत्मे घेऊनच!!!

साजच्या या खिरीच्या आग्रहाचे कारण दुसर्‍या दिवशी तिच्याशी फोनवर बोलताना कळाले. सगळे जण घरी येणार म्हणून तीने मोठ्या कष्टाने घाऊक प्रमाणात अवघ्या अर्ध्या तासात खीर बनवून ठेवली होती. आणि कोणीच त्या खीरीची चवही न चाखल्याने आता पुढील काही दिवस पराग आणि साजला ती खीर गोड मानून घ्यावी लागणार होती.

तर मंडळी, अशाप्रकारे १००% ह्युस्टनवासी मा.बो.करांची उपस्थिती अगदी अनपेक्षितरित्या पक्की झाली!

ठरल्याप्रमाणे सगळा मोर्चा पुर्वनिश्चित ठिकाणी पोहोचला आणि लवकरच रिमझिमचे त्यांचे उत्तमार्धांग श्रीयुत शैलेश आणि कन्यारत्न कु. वेधा यांच्यासह आगमन झाले. आणि मग तिच्या अपर्णा आणि मंदारशी गप्पा सुरु झाल्या. आम्हीपण तोपर्यंत शैलेशशी ओळख करुन घेऊन गप्पा मारायला लागलो. पण रिमझिमसाठी मात्र आम्ही जणू त्या गावचेच नव्हतो. मग आम्ही सगळे 'ला मेडलीन' नामक फ्रेंच हाटिलात गेलो. तिथे बराच वेळांनंतर सगळ्यांशी गप्पा झाल्यावर आणि आम्हाला बर्‍यापैकी अनुल्लेखाने मारुन झाल्यावर रिमझिमला आम्हा आगंतुकांची आठवण झाली आणि मग माझ्याकडे आणि भूषणकडे पाहून शेवटी बाईंसाहेबांनी प्रश्न विचारला....'तुमच्या पैकी अविकुमार कोण?' मी शांतपणे भूषणकडे बोट दाखवले. तर बाईसाहेब फक्त 'अच्छा अच्छा' म्हणून गप्प! मग म्ह्टले जाऊदे आपणच ओळख करुन देऊ आणि पुन्हा नव्याने करी ओळख करुन दिली तरी बाईसाहेब पुन्हा... 'अच्छा अच्छा' म्हणून गप्प! मग आम्हाला पुन्हा 'मूग' गिळावे लागले.

थोड्यावेळातच सगळे स्थानापन्न झाले आणि मग मात्र गप्पा टप्पा, खान्-पान जोरात चाली झाले. कु. वेधा ही मायबोलीची टोपी घालून आल्यानं 'वेधा' हिच एकमेव अधिकृत मायबोलीकर हजर असल्याचं आशिषचं मत पडलं! सगळ्यांचं खान्-पान चालू असताना मी आणि भूषण मात्र फक्त 'आंब्याचा चहा' मागवून स्वस्थ बसलो होतो. पण सगळ्यांचं खाणं संपलं तरिही आम्हाला काही 'आंबा चहा'चं दर्शन झालं नाही. यांनी खास रत्नागिरीहून आंबा आणि आसाम मधून चहा मागवलाय की काय इतपत शंका आल्यामूळे चौकशी केल्यावर असे निष्पन्न झाले की 'आंबा चहा' नामक प्रकार आपण स्वतःच मशिन मधून (गाळून?) आणायचा. भूषणने 'टी' जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि दोन ग्लास भरुन चॉकलेटी रंगाचा आंबा चहा घेऊन आला. आम्ही मोठ्या आशीनं.. आपलं.. आशेनं पहीला घोट घेतला आणि भूषणनं पठ्ठ्यानं 'आंबा चहा' ऐवजी 'कारला चहा' आणला की काय अशी 'टी'व्र शंका येऊन गेली. शेवटी दुसरा घोट न घेता त्या चहाला मी आणि भूषणनं अनुल्लेखानं मारलं!

रिमझिम ही उपस्थितांमधील सर्वात सिनिअर मायबोलीकर असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. मी या सन्मानासाठी फक्त काही आठवडे कमी पडलो. पण माझे मा. बो. चे नोंदणी करण्यापुर्वीचे रोमातले महिने धरुन तो सन्मान मनातल्या मनात स्वतःला देऊन टाकला.... !!! तर अशा प्रकारे बर्‍याच जिव्हाळ्याच्या गप्पा, खानं-पिनं होऊन सर्वांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मी आणि भूषण आशीबरोबर तिच्या घरी रात्रीच्या मुक्कामाला पोहोचलो.

दिवसभराच्या दगदगीनंतरही आशीनं थोड्याच वेळात स्वादिष्ट स्वयंपाकाचा जंगी बेत केला. आणि तोही अगदी थोड्याच वेळात. त्यातही मूगाचे वरण बनवून तिने अप्रत्यक्षरित्या मला मूग खाऊ घालण्याचा मनसूबा तडीस नेला. आशिष तर काय...रसिक माणूस.. त्यामुळे जेवणाचा बेत साग्रसंगीत आणि हसत खिदळत पार पडला. रात्री उशिरा कधी तरी १२-१२:३० वाजता निद्रादेवीच्या आधिन झालो. दुसर्‍या दिवशी सकाळी आशीने बनवलेले चमचमीत चहा-पोहे खाऊन आणि आशि-आशिष्-अर्णवचा प्रेमळ निरोप घेऊन परतीच्या रस्त्याला लागलो.

जसजसं ह्युस्टन मागे पडत होतं तसतसे मनातले आठवणींचे तरंग अधिकाधिक गहिरे होत होते. टेक्सासबाफ ला आम्ही सगळे श्रावणबाफ म्हणतो. श्रावणात जसे 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असतं, तसंच टेक्सासबाफवर कधी पोस्टांचा पाऊस तर कधी मंदारची 'सुप्रभाति' पोस्ट सोडून काहीच नाही, असा श्रावणी ऊनपावसाचा खेळ चालू असतो. म्हणूनच ए.वे.ए.ठि. ला 'मेंबरां'च्या उपस्थितीचा दुष्काळ जाणवण्याची शक्यता गृहित धरुन निघलेला मी, टेक्सासकरांच्या अविश्वसनीय प्रतिसादाच्या, आदरातिथ्याच्या, अवखळपणाच्या, अगत्यशीलतेच्या अशा अगणित आठवणी मनात साठवूनच परतीच्या प्रवासाला लागलो होतो......

Tuesday, May 12, 2009

कितीदा....?

वेदनांच्या सरणावरती, मी जळलो कितीदा
संवेदनांना तुझ्या तरी, मी कळलो कितीदा?


प्रेमविरोधी दळण दळले आजवरी, पण हरलो
बघता बघता जात्यामध्ये, मी आदळलो कितीदा


मनमोहक तुझ्या अदांवरी, भाळलो नित्य असा
तोल दिलाचा जाता जाता, मी सांभाळलो कितीदा


जळलो, संपलो कधीचा, त्या प्रिती कटाक्षाने
नयनी तव सामावण्या, मी ’काजळ’लो कितीदा


संध्यावेळी वळलो तुजला, निरोप द्यायला जेव्हा
विरहाने तुझ्या सखे, बघ, मी मावळलो कितीदा

-- अविनाश

Monday, August 18, 2008

भूल

भूल

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे

आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले
तमा कुणाला जो तो, स्वत:मध्ये मश्गूल आहे

जाळुनी जन्मभरी स्वत:ला, भाजली रे भाकरी
प्रितभरल्या फुंकरीला तरसे, मी विझणारी चूल आहे...

अर्पिले सर्वस्व तुजला, वसविले मनमंदिरी
हात नाही जोडले, हीच माझी भूल आहे?

- अवि

Saturday, April 26, 2008

व्यथा

व्यथा व्यर्थ मनीच्या, कुणा मी सांगणार नाही
हरलेला डाव आता, पुन्हा मी मांडणार नाही

वेडा म्हणा कुणी, मज म्हणा कुणी अभिमानी
पायी उगाच तुमच्या, असा मी रांगणार नाही

घरभेदी म्हणती आप्त, या विभिषण धर्माला
रक्त तुजसाठी तरी, रावणा, मी सांडणार नाही

तुडवतील सहजा सहजी, ते कोवळ्या भावनांना
लक्तरे वेदनांची वेशी, अता मी टांगणार नाही

भोगीन भोग सारे, मी पुण्य सारे विसरुनी
सावळ्या हरीशी तरी, बघा, मी भांडणार नाही

--अवि

Monday, March 17, 2008

प्रेमदिन

प्रेमदिन

रम्य संध्याकाळच्या आपल्या भेटी
सखे मला अजुनही आठवतात
तुझे ते निरागस हसु आठवताना
हळुच माझा गळा दाटवतात

हसत हसत विचारलेले तुझे प्रश्न
ह्रुदयात प्रेमाचे काहुर माजवतात
तिरपा कटाक्ष टाकत दिलेली उत्तरे
तुला अजुनही तितकेच लाजवतात?

थरथरणारे तुझे धुंद श्वास
भोवताली माझ्या जाणवत रहातात
अन राहुन राहुन तुझ्या आठवाने
पापण्यांच्या कडा पाणवत रहातात

तुझ्या प्रितीची मुक साद
सखे मला कळते आहे
माझेही वेडे मन
तव भेटीलागी तळमळते आहे

शहरांत असो अंतर कितीही
मनाने आणखी जवळ येऊया
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....

--- अविनाश

Wednesday, October 31, 2007

चिरा

चिरा

‌ऋतुमागूनी जाती ‌ऋतु, सर्वस्व परी तुज वाहीन मी
होऊनी निष्पर्ण पिंपळ, बहरता तुज पाहीन मी

दुरावलो जरी आज तुजला, रोष नाही सखे तुजसवे
वेदनांचे घनवादळ झेलित, एकटाच मूक साहीन मी

गुन्हा काय अन अपराध कुणाचा, अर्थ न उरे त्यास काही
मीच इथला फिर्यादी तरी, जामीन तुज राहीन मी

उन्मळून पडलो आज, अन जाहलो बेचिराख जरी
होऊनी खग नवफिनिक्स, पुन्हा उडुन दाविन मी

यशशिखरावरी जल्लोषामध्ये, विसरशिल तु मजला
मनमंदिराच्या पायरीशी तुझिया, एक चिरा प्राचिन मी.....

- अवि

वेदना

वेदना

ढाळू नकोस अश्रु, जरी त्यांसी मोल आहे
तव मधुर हास्य सखे, मजसाठी अनमोल आहे....

तुझ्या मनीची व्यथा, जाणतो मी प्रिये
कसे समजाऊ तुला, इथे तोच माहोल आहे....

असह्य यातना अशा, तुझ्या विरहाच्या किती
तव नयन बाणांचा, हा घाव खोल आहे....

आठवणींचा प्रवास असा, करतो पुन्हा पुन्हा
जाणार तरी कुठे मी, ही धरणी गोल आहे....

मनोमनी सहजीवनाचे, सुखचित्र मी रेखाटतो
प्रितीविना व्यर्थ सारे, सारे कवडीमोल आहे....

--- अविनाश पेठकर

Monday, July 16, 2007

पाऊस

पाऊस

ढग दाटुन येतात
अन तुझी आठवणही
दिशा अंधारुन जातात
तसं माझं मनही

अधिर पावसाला
मग मी समजावु पहातो
पाउसही थोडावेळ
माझं ऐकत रहातो

मित्रा, तु काय नेहमीसारखाच
बेधुंद बरसशिल रे
माझे डोळे मात्र
सखीला पहाण्यासाठी तरसतील रे

प्रियेची वाट पहाणारा
मीही वेडा चातक ना?
प्रेमी जीवांच्या ताटातूटीचे
करनार नाहिस तु पातक ना?

शपथ तुला तुज प्रियेची
तुला आहे प्रितीची आण
सखीच्या विरहाने अथवा
जातील रे माझे प्राण.....

...............................

प्रियेच्या भेटीला मग
हळवा पाउसही तरसतो
अन माझ्यासारखाच तोही
फक्त डोळ्यांतुनच बरसतो...
अन माझ्यासारखाच तोही
फक्त डोळ्यांतुनच बरसतो...

अविनाश

Sunday, February 18, 2007

प्रिती


प्रिती

प्रिती

तुझ्या मुखीचा शब्द मी, अन तुच माझी वाणी गं
तुझ्या सुरांवाचुन अधुरि, सारीच माझी गाणी गं

तुज संगतीत मिळे मज, ग्रिष्मातही सुखद गारवा
तुजविण भासे श्रावण व्यर्थ, टपटपणारे पाणी गं

मिळताच नजर तुजसवे, वर्षति कितिक प्रेमगिते
वळताच नजर विरह पाझरे, ह्रुदयातुन या विराणी गं

राग जरि हा लटका, अनुराग कळेना कसा करु
प्रितित तव गुरफ़टलेला, मी वेडा अज्ञानी गं

मम गझलेचे तुझ्यासवेचे, साम्य कितीक हे सखये
गझल हि जर काव्याची तर, तु मज दिलाची राणी गं!

--अविनाश

Sunday, November 19, 2006

तु + मी = ? (IMAGE)

तु + मी = ?

तु + मी = ?

तु अधिक मी बरोबर काय?
असे तु मला अनपेक्षितपणे विचारलेस
तेव्हा मी शांतच राहीलो..कारण
उत्तर अवघड होते म्हणून नव्हे
उत्तर तुलाही माहित होते म्हणुनच...

तरीही तु मला विचारतच राहिलीस..
आणि मीही विचार करतच....
तु अधिक मी बरोबर काय?
किती किती म्हणुन उत्तरे देऊ...

तु अधिक मी जणु आकाश अन धरा
तु अधिक मी जणु नदी अन झरा....

तु अधिक मी जणु तारुण्य अन सौंदर्य
तु अधिक मी जणु मधु अन माधुर्य.....

तु अधिक मी जणु राजहंसाची जोडी
तु अधिक मी जणु मालकंसाची गोडी.....

तु अधिक मी जणु वारकरी अन देव
तु अधिक मी जणु मर्मबंधातली ठेव.....

तु अधिक मी जणु ताटीचे अभंग
तु अधिक मी जणु भक्त नामात दंग....

तु अधिक मी जणु श्रावणाची हळुवार चाहूल
तु अधिक मी जणु जोहरची अंजली अन राहुल....

तु अधिक मी जणु अनुरेणुंतुन पाझरनारी प्रिती
तु अधिक मी जणु नवयुगुलांची गोडसर भीती....

तुझ्याविना माझे जगणे, सखे, जगणेच धरत नाही,
आपल्या नात्यामधे असले गणित, मी कधीच करत नाही,
कारण...
तु वजा जाता माझा मीच उरत नाही...
तु वजा जाता माझा मीच उरत नाही...

- अविनाश पेठकर

Saturday, July 29, 2006

ललित

ललित


शुक्रवारची संध्याकाळ. अंगावर येणारा आणखी एक विकएन्ड. न्युयॉर्कला येउन मला एक महिना झाला. आणि चारमधले तीन विकएन्ड्स एकटाच घरात बसुन चॅटींग करण्यात आणि कॉम्प्युटरवर पिक्चर बघण्यात घालवलेत. इकडे येताना ड्रायव्हींग लायसन्स न काढल्याबद्दल आत्तापर्यंत स्वतःला शंभर वेळा तरी शिव्या घातल्या असतील. त्यामुळे या विकएन्ड्लापण घरीच बसण्याशिवाय काहीच पर्याय नाही म्हणुन उसासा टाकतच होतो की स्क्रीनवर एक मेसेज झळकला.... ललित शाह.

ललित शाह... एक अजब रसायन. एकदम मोकळा आणि बेफ़िकीर. त्याची आणि माझी ओळख कंपनीच्या एका मिटिंगमधे झालेली. आम्ही एकमेकांना फ़क्त व्हिडिओ कॉन्फ़रन्स मधे पाहीले होते आणि मीटींगनंतर माझ्या जागेवर येउन बसतो न बसतो तोच पठठ्य़ाने मेसेज टाकून मराठीत माझी चौकशी चालवली आणि तीही अगदी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखी! वास्तविक माझ्या कंपनीमध्ये तो एका मोठया हुद्द्यावर आहे, पण त्याच्या बोलण्यात कसल्य़ाहीप्रकारचा अभिनिवेश नव्हता. मी अमेरीकेत आल्यापासुन आम्ही कामाच्या व्यापामुळे ('माझ्या कामाच्या व्यापामुळे' असे तो म्हणतो कारण त्याच्या मते तो ऑफिसमधे फ़क्त पाट्या टाकायला जातो! मीही तसे काही फारसे वेगळे करत नाही म्हणा!) फक्त दोनतीनदाच भेटु शकलो होतो.

त्याचा आलेला मेसेग जेव्हा मी उघडला तर त्यात त्याने विचारले होते 'ड्राइव्हींग करतोस का?'. आता मात्र मी अजुनच वैतागलो. अजुन एकदा स्वत:ला शिव्या घालत जेव्हा त्याला कारण विचारले तर म्हणाला, "घरी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलाय आज. येतोस?" मी त्याला माझी ड्रायव्हींगची अडचण सांगितली तसा त्याने लगेच श्रीनिवासबरोबर मला चिकटवुन दिला. मी भलताच खुष झालो. वास्तविक तो घरगुती कार्यक्रम म्हणजे शेअर मार्केटवर एक माहितीवजा व्याख्यान होते आणी तसा माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. पण चारचौघांमधे मिसळण्याची मला संधी मिळत होती हेही नसे थोडके.....

कार्यक्रमाची वेळ होती संध्याकाळी सातची. श्रीनिवासला जरा जास्तच काम असल्यामुळे आम्ही ऑफीसमधून परस्परच जायचे ठरवले. त्याप्रमाणे संध्याकाळी साडेसहाला मी आणि श्रीनिवास त्याच्या कारने ललितकडे निघालो. दहा मिनीटातच आमची गाडी ललितच्या टुमदार दुमजली अपार्टमेंटसमोर येउन थांबली. श्रीनिवास कार पार्क करुन येईपर्यंत मी घराकडे पहात बसलो. घरासमोर एक ऐसपैस कारपार्कींग आणि छानशी हिरवळ. मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर छोट्या छोट्या कुंडयांमधे लावलेली वेगवेगळी शोभेची झाडे. कुंडयांच्या आजुबाजुला गारगोट्यांनी केलेली लक्षवेधी सजावट. एकुणच प्रसन्न वातावरण होते. आत जाताच ललित, त्याची पत्नी पल्लवी आणि पल्लवीच्या आई या सगळ्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले. ललितने त्यांच्याशी माझी ओळख करुन दिली. पल्लवी ताई आणि काकूंनी आस्थेने माझी विचारपुस केली आणि पुढचे दोन अडिच तास मी त्यांच्या घरचाच बनुन राहीलो.

घराच्या बेसमेंटला एक छोटासाच पण १५/२० लोक सहज बसतिल असा एक हॉल होता. तिथेच प्रस्तावित व्याख्यानाची जय्यत तयारी दिसत होती. काही आमंत्रित आधीच येउन बसलेले दिसत होते. एका टबलावर फराळाच्या पदार्थांची रेलचेल दिसत होती. माझे लक्ष वेधले ते समोशांच्या प्लेट्ने. ती रिकामी होण्याआधी फराळाचे आमंत्रण मिळते का नाही याची वाट बघत बसलो. ललितने तिथे बसलेल्या सगळ्यांशी ओळख करुन दिली तरि माझा एक डोळा समोशांच्या प्लेटवरच. ललितला बहुतेक माझ्या मनातले समजले असावे कारण त्याने लगेच मला फराळाला चलण्याचा आग्रह केला. मी पण 'नेकी और पुंछ पुंछ असे म्हणत (मनातल्या मनातच!) फराळाच्या टेबलकडे माझा मोर्चा वळवला. सुदैवाने अजुनही बरेचसे समोसे प्लेट्मध्ये दिसत होते आणि आनंदाने मी समोशांचा माझा पहिला हप्ता उचलला. तेवढ्यात ललितने मला एक गारेगार शितपेयही आणुन दिले. मी त्याला विचारले की एवढे सगळे पदार्थ आणले कुठुन? त्यावर हसत हसत तो म्हणाला, " आणतोय कुठुन?आम्ही सगळ्यांनी मिळुन घरीच बनवले आहेत. या कार्यक्रमासाठी घरातल्या सगळ्याच मंडळींची दिवसभर तयारी सुरु आहे!" आता गार व्हायची पाळी माझी होती.

ईतर पाहुण्यांची सरबराई करण्यात ललित गुंग असलेला पाहुन मी पण हळुच मागल्या कोपऱ्यातली जागा पकडुन शांतपणे समोशांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. समोसे तर एकदम लाजवाब होतेच, पण सोबतीला असलेल्या पुदिना आणि चिंचेच्या चटण्याहि तितक्याच चवदार होत्या. प्लेट रिकामी होताच आमची स्वारी परत फराळाच्या टेबलकडे वळली. बघतो तर काय? प्लेटमधल्या समोशांची संख्या बरीच रोडावली होती आणि पाहुणे तर अजुनही येताना दिसत होते. पण खाण्याच्याबाबतीत मी कुणाचीच पर्वा करित नसल्याने हळुच समोशांचा दुसरा हप्ता मी माझ्या प्लेट्मधे सरकवला! (कोण खादाड म्हणतंय रे तिकडे?)

यथावकाश सगळी आमंत्रित मंडळी फराळ संपवुन आपापल्या जागांवर येउन विराजमान झाली. पल्लवीताई आणि काकु मागे येउन बसल्या आणि व्याख्यानाला सुरुवात झाली. तशी ललित सगळ्यांच्या मागे जाउन व्हीडिओ कॅमेरामॅनच्या पदावर रुजु झाला. व्याख्यानादरम्यानही तो सगळ्यांचे हवे नको ते पहात होता. मधेच फॅन आणुन लाव, कागदे पोचव, पेन्सिली वाट असे त्याचे काही ना काही चालुच होते. एकुणच व्याख्यान खेळिमेळीच्या वातावरणात पार पडले. व्याख्यान संपताच फराळाच्या टेबलावर समोशांनी रेलचेल भरलेली प्लेट आणुन ठेवली गेली आणि मग मी पण पडत्या फळाची आज्ञा मानुन तिकडे कुच केले. इकडे सगळ्यांच्या गप्पा चालु झाल्या आणि मी हळुच समोशांचा अजुन एक हप्ता माझ्या प्लेट मध्ये सरकावुन दिला (सारखे सारखे खादाड म्ह्टलेले मी मुळिच खपवुन घेणार नाही..आधिच सांगतोय!). ललित सगळ्यांशी बोलण्यात गुंग होता. घरच्या सगळ्या मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.

हळुहळु एक एक उपस्थित परतु लागला आणि ललित प्रत्येकाला निरोप द्यायला आवर्जुन घराच्या बाहेर पर्यंत जात होता. मी आणि श्रीनिवास सगळ्यांत शेवटी निघालो. तो खुपच पेंगुळलेला दिसत होत. आदल्या रात्रि कामासाठी केलेल्या जागरणाचा परिणाम होता तो. त्यामुळे जेव्हा मला घरी सोडवायची 'जबाबदारी' त्याने आपणहुन घेतली तेव्हा मला अपराध्यासारखे वाटु लागले. पल्लवीताईने आणि काकूंनी मला परत घरी यायचे आमंत्रण देतच निरोप दिला.

परतीच्या वाटेवर कारमध्ये जगजित आणि चित्राची गझल ऐकता ऐकता मनात विचारांचे तरंग उठत राहीले. कोन कोणति हि माणसे? कोण हा ललित आणि पल्लविताई? अशी कितिशी ओळख आपली त्यांच्याशी. पण थोडयाच भेटींत कोणालाही आपलेसे करुन घेण्याचा त्यांचा स्वभाव पाहील्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. त्यांची अगत्यशिल वागणुक, निर्मळ आणि निर्व्याज मैत्रीची भावना... खरेच..म्हणतात ना की काही लोक जगात 'मित्र' म्हणुनच जन्माला येतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे ते अघोषित मित्र असतात. शहा कुटुंबियही त्यांच्याच पैकी....नाही का?

समाप्त

Sunday, July 23, 2006

चिरा

ऋतुमागूनी जाती ‌ऋतु सर्वस्व परी तुज वाहीन मी
होऊनी निष्पर्ण पिंपळ बहरता तुज पाहीन मी

दुरावलो जरी आज तुजला, रोष नाही सखे तुजसवे
वेदनांचे घनवादळ झेलित एकटाच मूक साहीन मी

गुन्हा काय अन अपराध कुणाचा, अर्थ न उरे त्यास काही
मीच इथला फिर्यादी तरी जामीन तुज राहीन मी

उन्मळून पडलो आज अन जाहलो बेचिराख जरी
होऊनी खग नवफिनिक्स पुन्हा उडुन दाविन मी

यशशिखरावरी जल्लोषामध्ये विसरशिल तु मजला
मनमंदिराच्या पायरीशी तुझिया एक चिरा प्राचिन मी.....

--अविनाश

म(ना)ला भावलेलं.....!

म(ना)ला भावलेलं.....


झेप घेतल्यावर पडलो
तरि
एक समाधान असतं
बसल्या बसल्या पडलो नाही
झेप घेतली होती...

(तुषार जोशी, मायबोली)

परदेश वारी

परदेश वारी

परदेश वारीबद्दल आजवर अनेकांनी लिहीले आहे. खरेतर त्यांच्यासमोर मी म्हणजे कीस झाड की पत्ती.. पण 'कुणीतरी' म्हटलंय ना की 'लिहीणाऱ्याने लिहीत रहावे. आपले कोणी वाचेल की नाही याची पर्वा करु नये' म्हणुन लिहीत जावे असे ठरवले आहे...

तर आमच्या कंपनीचे ऑफ़ीस न्यूयॉर्क ला आहे असे म्हट्ल्यावर त्याबद्दल माहीती गोळा कराय़ला सुरुवात केली आणि... न्यूयोर्क ही अमेरीकेची राजधानी ईथपासुन ते न्यूयोर्क ना? आधी बघून घ्या बुवा नकाशामधे..नक्की अमेरिकेतच आहे ना..इथपर्यंत माहीती मिळाली. पण माझी ही अमेरिका वारी न्यूयोर्क पासुन म्हणन्यापेक्शा चेन्नई पासुनच खऱ्या अर्थाने सुरु झाली.
--------------------------------------------------

चेन्नई

चेन्नई बद्दलही मला विशेष अशी माहीती नव्हती. पण विसा इंटरव्यूला जायची सगळी व्यवस्था कंपनीच करणार असल्याने विषेश चिंता नव्हती. चिंता होती ती इंटरव्य़ूची. त्या बद्दलची अनेक वर्णने आणी तो नापास झालेल्यांचा कॉन्सुलेटच्या नावाने चाललेला शंख ऐकला की पोटात गोळा यायला लागायचा. असेही ऐकुन होतो कि तिथे एक अशी अमेरीकन बाई अशी आहे की तिच्याकडे इंटरव्यूसाठी येणाऱ्या प्रत्येकाला रीजेक्ट करते. ही गोष्ट मी सगळ्यांसमोर हसण्यावारी घालवली असली तरी मनातून चांगलाच टरकुन होतो. माझी तर अशी खात्री होत चालली होती की अमेरिकेची अर्थव्यवस्था ही कॉन्सुलेटमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच इतकी सबळ झाली असली पाहिजे. असो.

होता होता चेन्नईला जायचा दिवस येउन ठेपला. मस्तपैकी ऐटित कार मधे जाउन बसलो (बरेच लोक या कारला 'कॅब' असे म्हनतात. पण असे म्हणने म्हणजे त्या कारचा आणि त्यात बसणाऱ्या माझ्यासारख्यांचा अपमान आहे असे मला वाटते). तर वेळेआधी तासभर कारने मला हैदराबाद एअरपोर्टवर आणून टाकले. 'टाकले' यासाठी कि, मी आणि माझी बॅग कारमधून बाहेर पडतो न पडतो तोच तो गेला पण निघुन! हे 'कॅब'चे ड्रायव्हर आजकाल खुपच शेफारले आहेत. पण म्हटले चला बरे झाले टिपची कटकट वाचली. तशी ती देने मला परवडत नाही अशातला भाग नाही पण त्याला मुख्यत्वे दोन कारणे आहेत.
पहीले म्हणजे हे लोक्स अशा हक्काने आणि आग्रहाने ती मागतात की आपण त्यांचे कोणीतरी देणेकरी आहोत असे वाटायला लागते. आणि समजा दिलीच तर असे काही तोंड करतात की आपण काहीतरी गुन्हा केला आहे असे वाटायला लागते (एकदा तर एका हॉटेलच्या वेटरने ताटात ठेवलेली टीप आम्हाला परत आणुन दिली होती. का तर कुत्सित्पणे म्हणे की असुदे तुम्हालाच तुमच्या कामाला येईल).
दुसरे कारण म्हणजे घरात आपले आईवडिल एक दोन रुपये वाचवण्यासाठी भाजीवाल्याबरोबर हुज्जत घालतात आणि आपण निव्वळ आपले स्टेटस सांभाळण्यासाठी पैसे उधळत सुटलो आहोत असे मला वाटायला लागते.

तसा या एअरपोर्टवर मी या पुर्वीपण बऱ्याचवेळा येउन गेलो आहे आणि दरवेळेस मला एअरपोर्टवर आल्यासारखे न वाटता रेल्वे स्टेशन वर आल्यासारखे वाटते. पण आज मी वेगळयाच मूड्मध्ये होतो. फ़ुकटात विमानप्रवास म्हटले की मी नेहमीच आनंदी असतो. आता तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला या एका तासात काय केले, त्यानंतर एअर ईंडीयाच्या विमानाचा प्रवास कसा त्यांच्या नावाला साजेसा झाला, विमानात काय काय फुकटात चापायला मिळाले असे काहीतरी सांगत बसेन. पण नाही. मी माझा पहीला फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव सांगण्यास फारच उत्सुक असल्याने हे सर्व पुन्हा कधीतरी (हुश्श! वाचलो' असे कोण म्हनाले रे तिकडे?)
मिश्किली
-----------------------------
नमस्कार. खाली एक पत्र देत आहे. हे माझ्या एका चांगल्या मित्राने मला लिहिलेले आहे. बर्याच दिवसांनंतर आमचा संपर्क झाला. मी पाठवलेले frindship invition स्विकारल्याबद्दल त्याला Thakns म्हनण्याची घोड्चुक मी केली आणी हे पत्र त्याचे उत्तर आहे. अगदीच राहवलेच नाहि म्हनुन देत आहे. ईथे मि फ़क्त ट्रान्स्लेटर ची भुमीका बजावली आहे. या पत्राचे यथावकाश उत्तर दे‌इनच आणी जमलेच तर इथे ते टाकीनही. तोपर्यंत या हरहुन्नरी मित्राचा मिश्किलपणा......
-~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार, मैत्रीचे आमंत्रण द्यावे लागत नाही. आमंत्रण देवुन होणारी मैत्री नव्हेच, तो झाला व्यवहार, ज्यात धन्यवाद आणि तत्सम शब्द येतात.़़़़च्या, कसा आहेस असे विचारले असतेस तर बरे वाटले असते.असो.
तु पल्याडल्या देशात गेलास असे कळाले. ऐकुन परमानंद झाला.तिकडे "वातावरण" बरेच चांगले असते अशी ऐकिव बातमी आहे.मी इथे "संध्याकाळच्या मराठी" बातम्या पहातो! "त" म्हटले कि तुला ताकभात कळत असावा. तसा तु लहानपणी खूप ताकभात खायचास असे मला काकू सांगायच्या. त्यामुळे प्रत्यक्षदर्शनी "वातावरणाचे" वर्णन माझ्या पेर्सनल आय डी वर पाठवले तरी चालेल.
"सुटत चाललेला जुना ढग" या शब्दांतली मेख माझ्या लक्षात आलेली आहे. डायरेक्ट क्लीन बोल्ड!!! माझे पोट एवढेपण सुटलेले नाही. बायको थोडेफार खायला घालते त्याची अवकृपा आहे. डायरेक्ट 'ढोल्या' म्हटले असते तरी चालले असते.मला आजवर टोचुन कोणीहि बोललेले नाही (अगदी माझी बायकोसुध्धा!. Thanks to her!. ). माझ्या डोळ्यांत अगदी पाणी आले.इथे पुण्यात पाणीच पाणी झाले आहे. खूपच पा‌उस पडत आहे. बायको घरातच असते. पावसामुळे भाजीपाला महाग झाला आहे. 'भाजीपाला' या सारखा योग्य शब्द मराठीत नाही.लग्न झाल्यापासुन भाजीचा पाला खातो की पाल्याची भाजी हे कळायला मार्ग नाही. शेळीपालनाचा विचार करत आहे.शेळीला पालेभाजी आवडते. मी फ़ारसा विचार करत नाही.तशी सोयही नाही.मलाही शेळी झाल्याची स्वप्ने पडतात.रात्री घोरायच्या ऐवजी बे बे असे ओरडतो. आणि मग बायकोपण.पण ती शेळीसारखी ओरड्त नाही.तिचा आवाज किती 'मंजुळ' आहे हे आजुबाजुच्या पन्नास एक घरांना एव्हाना माहीत झाले आहे.
रामदास स्वामींनी लग्न केले नव्हते. बोहल्यावरुन ते पळुन गेले होते. त्यामुळेच त्यांना 'स्वत:च्या ' मनाचे श्लोक लिहिता आले.जय जय रघुवीर समर्थ. मी आजकाल रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र पण वाचतो.बरे वाटते. फायदा होतो (स्वानुभव!)
बाकी माझे बरे चालले आहे.मी आता सकाळी चालायला लागलो आहे.तु पण सकाळी चालत जा.डायटींग कर. तसे मी माझ्या 'सौं"ना पण सांगुन पाहिले. फ़ारसा 'फ़रक' नाही.जेवण स्वत: करुन खात जा.स्वत: करुन खाण्यात काही औरच मौज आहे.स्वानुभवावरुन बोलतो आहे.पदार्थ खाता येतात.जेवणाला नावे ठेवु नकोस.मी पण ठेवत नाही.एकदाच ठेवुन पाहिली.ते शेवटचेच.
बायकांप्रमाणे पुरुषही कशातही मागे नसतात. ते कुणाच्याही मागे लागत नाहीत.तु ही लागु नकोस. Office मध्ये फ़क्त कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न कर.मी पण करतो. Office हि संकल्पना बहुदा पुरुषानेच चाणाक्षपणे शोधुन काढली असावी असा माझा कयास आहे.त्या निमित्त घराबाहेर मोकळा श्वास घेता येतो.कामाचे तास फ़क्त ८ असतात.मी ओव्हरटा‌इम पण करतो.घरी जायला उशीर होतो.तसा बायकांना आवरायलाही उशिर होतो.पण उशीर उशीर मधे पण फ़रक असतो. तु अजुन लहाण आहेस. बाळपणीचा काळ सुखाचा असे द. मा. मिरासदार म्हणतात.
तुझ्या आजुबाजुला कोण आहे याची आस्थेने चौकशी कर. फ़ायदा होतो (़स्वानुभव नाही़़).गैरफायदा घे‌उ नकोस. तुला तशी सवय नाही म्हणा. पण तरिही... नविन मित्र मैत्रिणी जमव.आत्ताच सोय आहे.मला इथे बरेच मित्र आहेत.मैत्रिणी 'होत्या'.नविन होत नाहीत फारश्या. 'प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलहि गळे' अशी मराठीत एक म्हण आहे.ही म्हण लिहिणार्याने नक्की कोणते प्रयत्न केले असावेत हे कळायला मार्ग नाही.'प्रयत्नांती परमेश्वर' अशीही एक 'भयावह' म्हण आहे. त्यामुळे मी फ़ारसे प्रयत्न करित नाही.
हाती घेशील 'ते' तडिस ने.समुद्रकिनारा हि जागा हातात हात घे‌उन जायला चांगली असते.पुण्यात समुद्र नाही याचे मला वैषम्य वाटते.त्यामुळे मी नदीकिनारी जातो."Behind every successful man there is a woman" या वाक्यात "behind" हा शब्द आहे.बायका विलक्षण चतुर असतात. मी आमच्या सौ. ला चतुरस्त्र म्हनतो.
तिकडे भरपुर फिरुन घे.पुन्हा पुन्हा कंपनीच्या खर्चाने जाने होत नाही.मला इथे 'स्व'खर्चाने खूप फिर फिर फिरावे लागते.पुन्हा पुन्हा फिरावे लागते.पुण्यामध्ये 'लक्ष्मी रोड' आणि 'फ्याशन स्ट्रिट' या एकदम बक्वास जागा आहेत. तसेच खिशाला चाट पडायला इथेपण मोठमोठे मॊल व्हायला लागले आहेत.मी प्रोटेस्ट करण्याचा विचार करीत आहे.त्यातल्या त्यात मला तुलशी बाग खुप आवड्ते.लहानपणापासुनच मला बाग खुप आवडते.इथे मला खुप आल्हाददायक वाटते.
पलिकडे जास्त खरेदी करु नकोस.मा्झ्याकडुन इथे खूप खरेदी होते.स्वत:ला जप. मी पण जपतो. First Aid चा box घे‌उन ठेव. मला अधुन मधुन 'लागतो'.तब्येतीची काळजी घे.शेवटी आपली आपल्यालाच घ्यावी लागते. 'शेवटी' म्हणजे एकदम शेवटी नाही, नेहमीच.
अरे हो, परत धन्यवाद म्हटलेस तर 'रिमोट कानाखाली' लावेन. माझ्याकडे तसे software आहे.मीच तयार केले आहे. टेस्टिंग करायचे आहे अजुन. 'फेल झाले तर काय' असा फुटकळ विचार माझ्या मनात येणार नाही.
पलिकडे जास्त पाडापाडि आणि मारामारी करु नकोस.लिंगोर्चा हा खेळ चांगला आहे.मला लहानपणी पकडापकडीचा खेळ खुप आवडायचा.माझ्यावर नेहमी राज्य या्यचे.मला राज्य घ्यायला खुप आवडायचे.आता फारसे खेळणे होत नाही.खेळात खूप पळापळ होते.आजकाल माझी खुप धावपळ होते.तसे आयुष्य हा पण एक खेळच आहे.पण दुर्दैवाने हा पकडापकडीचा खेळ दोघांतच खेळावा लागतो.सुरुवातीला आपल्याला राज्य घ्यावे असे फार वाटते.पण नंतर सत्तापालट (उलटापालथ) होते आणी राज्याकर्ते बदलतात.आपण धावतच रहातो. असो.
आता जास्त त्रास देत नाही.उरलेला नंतर दे‌इन.
बाकि सर्व क्षेम.
समाप्त