Wednesday, May 08, 2013

आजही...!


आजही...!

आजही...!

आपलेच आहेत ते ज्यांनी केलेत वार आजही
शब्द जयांचे घुसलेत हृदयात आरपार आजही

काय सांगू बरेवाईट तुझे, आज मी तुजला?
राहिला का तोच माझा अधिकार.... आजही?

समुद्राएवढी आहे की, आभाळाएवढी नक्की?
उमगत नाही मज या वेदनेचा आकार आजही

काय अप्रुप त्या धनाचे वाटणार सांगा?
'तोच' आहे मी तसाच निर्विकार आजही

विरुन गेली सर्व सुखे जरी गोड स्वप्नांपरी
त्या स्वप्नांचा मनात भरला बाजार आजही

सावलीही आज तुझी, 'अवी', साथ सोडू पाहते...
सोबतीला परी, 'तो', निर्गुण निराकार आजही...!

          ---- अविनाश पेठकर

Thursday, February 21, 2013

समाधान!

१९९७ साली, १० वी नंतर स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणी आता आपण कॉलेज कुमार झालो या भावनेने पोटामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या.

स. प. विद्यालयात दोनच वर्ष होतो मी, पण माझ्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत स. प. महविद्यालयाचा प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष असा फार मोलाचा वाटा आहे.

मी आणि माझा मित्र सुशांत दोघेही मध्यमवर्गीय घरांमधुन. म्हणजे खिशामधे एक बसचा पास आणि ५ किंवा १० रुपये जास्तीत जास्त. दोघेही स. प. कॅंटीनमधे दुपारी डबा खाण्यासाठी जमत असु. पण डबा खाता खाता कँटीनमधे दरवळणारा विविध पदार्थांचा सुवास आम्हाला आशाळभुतासारखा इतरांच्या ताटाकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडायचा. आपणही काहितरी घ्यावे असं खुप वाटायचं... पण ऐपतच नाही तर काय करणार! यावर आम्ही दोघांनी एक उपाय शोधुन काढला. आम्हाला कळलं की तिथे एक वाटी सांबार एक रुपयाला मिळतं. मग काय, रोज आळीपाळीनं मी आणि सुशांत एक वाटी सांबार मागवायचो आणी डब्यातली चपाती त्यात थोडी थोडी बुडवुन दोघे खायचो. काय स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद असायचा त्यात. (तुम्ही हसताय!...पण एक वाटी सांबारकी किमत तुम क्या जानो रमेशबाबू!!!) तसं ते सांबारही तितकंच स्वादिष्ट होतं.. किमान आमच्यासाठी तरी. दोनतीन महिन्यांतून एकदा एक 'बनवडा' घ्यायचो आणि तो दोघांत अर्धाअर्धा खायचो. त्या दिवशी आनंदाने दिवसभर आमची गाडी हवेत असायची.

अजुनही सुशांत, मी आणी आमच्या बायका (बायकोचं अनेकवचन 'बायका'च ना वो?) ते दिवस आठवून खुप हसतो आणी जुन्या आठवणींमध्ये बुडून जातो.

खरे तर स. प. महाविद्यालयाच्या बाहेर असलेलं S.S. Canteen हेच कॉलेज कँटीन नावाला साजेसं होतं. तिथं असलेल्या so called modern ललनांकडे पाहुन आम्ही दोघंही अचंबित व्हायचो. आणी दोघेही त्यांच्या नावाने शंख करायचो. काय करणार्..कोल्ह्याला द्राक्षे आंबट!.. हडपसरचा बस स्टॉप निलायम चौकात असल्याने आम्हाला रोज S. S. समोरुनच जावे लागायचे आणी खिसे चाचपुन कधी कधी गाडी आतमधेही वळायची आमची. त्यावेळी कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त कसं हादडता येईल याचं गणित चालायचं डोक्यात. एकदा हे गणित कायमचंच सोडवलं आम्ही दोघांनी मिळुन. S S मध्ये 'समोसा-पाव' नावाचा प्रकार मिळत असे. त्यासोबत चिंचेची आंबट-गोड चटणी आणि तळलेल्या मिरच्या आपल्या हातानेच घ्यायच्या असा शिरस्ता होता. मग काय, आम्ही भरपुर चटणी ताटात वाढून घ्यायचो आणी पावातून समोसा बाजुला काढुन ठेवून फक्त मिरची आणि पावाबरोबर सगळी चटणी सफाचट करायचो. त्यानंतर मग पुन्हा जाउन चटणी आणायची आणि या वेळी ती मिरची अन समोशाबरोबर खायची!!! तर अशा रितीने एकाच पदार्थाच्या किमतीत दोन पदार्थ खाल्ल्याचे समाधान आम्ही मिळवत असू.

खिशात पैसे नसल्याची कसर आम्ही मनात भरपुर 'समाधान' भरुन घेउन भरुन काढायचो. मागे वळून पहाताना आता वाटतं, स्वतःच स्वतःच्या मनाला समजावनं खुप सोपं होतं तेव्हा. एक वाटी सांबारानं हॉटेलमधे जेवल्याचं समाधान.... भरपुर चटणी-मिरची खाउन पोट भरल्याचं समाधान.... मनातल्या मनात 'एखादी'वर जीव टाकुन प्रेमात पडल्याचं समाधान... कधी मधे J M Road आणि Ferguson Road वर चकरा मारुन आपणही मॉडर्न असल्याचं समाधान.... आणि असंच बरंच काही. मुळात आईवडिलांनी पोटाला चिमटा काढुन आपल्या शिक्षणासाठी केलेली खटपट पाहून आपोआपच जबाबदारीनं आलेलं शहाणपण असावं या समाधानामागं. वडिल दहावी तर आई चौथी पास..पण त्यांनी आपल्या मुलांसाठी पाहीलेलं स्वप्न आणि त्याच्या पूर्ततेसाठी केलेली परिस्थितीशी लढाई हे नेहमीच आम्हा मुलांसाठी प्रेरणादायी होतं. आजही आई जेव्हा "माझी तीनही मुलं 'साप्टेर इंजीनर' आहेत" असं अभिमानानं सांगते तेव्हा, आईवडिलांच्या अपे़क्षांना आपण खरं उतरु शकलो या जाणीवेनं मिळणारं समाधान हे खरंच खुप मोलाचं असतं...'अलौकीक' असतं.

[मायबोली.कॉम येथे पूर्वप्रकाशित    http://www.maayboli.com/node/1869  ]




Wednesday, January 23, 2013

बाजार

-----------------------------------------------
बाजार

नकोच वाटे खेळावयाला जीवनाचा रे जुगार आताशा
साव ना उरला कोणी झाला, जो तो चुकार आताशा

बंद खिडक्या, बंदही  दारे, मीच  बंद माझ्याचमध्ये 
घुसमटल्या अशा मनास , राहिला ना शेजार आताशा

निर्व्याज प्रेमास का तोलती 'त्या' पैशांच्या तराजूने ?
गढूळल्या मनास नको वाटती, भावना हळूवार आताशा

दिवसाउजेडी काय काय हे पहावे लागते डोळा
घेतो नित्य मिटूनी डोळे, बरा वाटतो अंधार आताशा

पाप पुण्याचा हिशेब तुही ठेवू लागलास म्हणे देवा
तुझीच ना लेकरे मग का झालास, तू सावकार आताशा?

तूच्छ लेखून सर्व जगा, श्रेष्ठ म्हणूनी हे मिरविती
अशा नगांचा जगात 'अवि', भरला बाजार आताशा!

---------------------------------------------------------------------






Thursday, September 13, 2012

क्षण

क्षण

शांत शांत मंद आनंदी, तर कधी उदास क्षण काही
सत्य कधी तर कधी नुसते, आभास क्षण काही

मैफलीत खळखळणारे क्षण अल्लड निर्झर तुझ्यासवे
तुजवीन नुसती हुरहुर, जाळणारे, जीवास क्षण काही

थरथरत्या कातरवेळी हळूवार स्पर्श तुझे ते पांघरती
ग्रीष्मझळा आठवांच्या कशा, सोसती भकास क्षण काही

स्वार्थभरल्या कुरुक्षेत्री एकटाच अविरत मी झुंजतो
मनोरथांचे चाक काढण्या, मागतो, जीवनास क्षण काही

हिवाळा

हिवाळा

दवबिंदू पानावर एकटाच घाबरला पहा!
ऋतूने शालू नवा आज पांघरला पहा!

आळसावली झोप अजूनी गोधडीतच लोळते
वेळ चुकली कशी? सूर्य किती बावरला पहा!

काय वेगळी दुपार आज भासते नवी नवी
चुकार एक किरण धुक्यातून पाझरला पहा!

गोठली सृष्टी सारी अन आसमंतही गोठला
प्रितचाफा शब्दांतून हळूच मोहरला पहा!

भाव मनीचा माझ्या परी गोठला नाही सखे
आठवांनी रोम रोम माझा कसा शहारला पहा!

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

मायबोलीवरील (www.maayboli.com) सदस्यांच्या या स्नेहमेळाव्याचा वृत्तांत मी मायबोलीवर पूर्वप्रसिद्ध केला होता (http://www.maayboli.com/node/28429). माझ्या लेखनाच्या एकत्रिकरणासाठी तो ईथे प्रसिद्द्ध करीत आहे.

हा स्नेहमेळावा मुक्काम 'गंधर्व उपहार-गृह', पुणे येथे सकाळी ०८:३० ते ११:०० या वेळेत पार पडला!
--------------------------------------

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

----------------------------------------

टीप: खालील वृत्तांतात कुणाचा उल्लेख राहून गेल्यास तो अनुल्लेखाचा प्रयत्न नसून मा.बु.दो.स. (माझ्या बुद्धीचा दोष समजावा!)
कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत लिखाणास अक्षम्य उशिर झाला आहे याची मला जाणीव आहे. तरिही 'आपलेच' मायबोलीकर समजून घेतील अशी आशा.
---------------------------------------------

रविवारी भल्या पहाटे ८:३० ला ’रविवार ब्रेकफास्ट गटग’ साठी नाव नोंदणी करावी की करु नये अशा द्विधा मन:स्थितीत बराच वेळ काढल्यानंतर शेवटी एकदाचा मनाचा हिय्या करुन उपस्थिती नोंदवून टाकली. तरिसुद्धा मनामध्ये शंका-कुशंका चालूच होत्या. एकीकडे प्रथमच पुण्यातल्या गटगला मायबोलीकरांना भेटण्याची उत्सुकता तर दुसरीकडे इतक्या भल्या पहाटेची वेळ गाठता येईल ना, गाठली तरी नियमित भेटणार्‍या पुणेकर मायबोलीकरांमध्ये उपरा तर ठरणार नाही ना अशा शंका. शेवटी काही का होईना, सकाळचा ब्रेकफास्ट तरी करून येऊ इतकीच माफक अपेक्षा मनात ठेऊन पहाटे ७ चा गजर लावून शनिवारी मुद्दाम लवकर झोपलो. पण हाय रे दैवा, सकाळी सौ. प्रितीच्या जोरजोरात आवाजाने जाग आली. पहातो तर काय ७:१५ झालेले. तरी बरं की नोंदणी केल्याच्या दिवसापासून रोज ’गटगला जायचंय’ असा आमचा जप आमच्यापेक्षा आमच्या ’उत्तमार्धांगांनीच’ सिरीयसली घेतला होता आणि बहु प्रयत्नांती आमच्या ’चिरनिद्रेत’ व्यवधान उत्पन्न करण्याचे साहस त्यांनी केले होते. आधीच जरासा उशीर झाल्यामूळे आजच्या सुट्टीच्या दिवशी अंघोळीलाही सुट्टी द्यावी का, हे आमचे स्वगत ऐकून ’सौं’नी तीव्र निषेधाचा पवित्रा घेतल्याने आम्ही भर पहाटे पांढरे निशाण फडकवत विनाशर्थ माघार घेतली आणि मायबोलीकर माझ्या विनाअंघोळीच्या पवित्र व मनोहारी ’अवतारा’ला मुकले! स्मित

बरोब्बर ८ वाजता साग्रसंगीत तयार होऊन हडपसरहून दुचाकीला टाच मारून आमचे वारू दौडत ’गंधर्व’च्या दिशेने निघाले सुद्धा. पुण्यात अभावानेच दिसणाया मस्त मोकळ्या रस्तांचा मनापासून आनंद घेत बालगंधर्वला पोहोचलो आणि फार उशीर तर झाला नाही ना असे वाटून घड्याळाकडे पाहीले आणि विश्वासच बसेना.... घड्याळ चक्क ८:१० ची वेळ दाखवत होते. स्वत:च्या दुचाकीचालनकौशल्याबद्दल उर एकदम भरुन आला. गाडी ’गंधर्व’ समोर लावून टाकली आणि पुढचा वेळ कसा काढावा या विवंचनेत बालगंधर्वला दिसणाया गर्दिकडे वळलो. जरा जवळ जाऊन पहाताच खुप मोठा स्त्रियांचा घोळका बालगंधर्वच्या प्रवेशद्वारावर रांगेत उभा होता आणि एकदम भूत पाहिल्यासारखा माझ्याकडेच पहात होता. बायांच्या घोळक्यात एकदम हा बाप्या कुठून आला असा भाव त्यांच्या चेहयावर दिसल्याने ’ही गर्दी कशासाठी’ हा मनात आलेला आगाऊ प्रश्न मनातच ठेवून तिथून काढता पाय घेतला आणि ’गंधर्व’च्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर उभा राहून त्याच्या प्रवेशद्वारावर चालणाया घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून बसलो.

८:२५...८:३०...८:३२..................८:३३.......बरोब्बर ८:३४ वाजता गंधर्वच्या प्रवेशद्वाराजवळ एक ४/५ जणांचा ग्रुप दिसला तसा तिथे जाऊन घाबरत घाबरत ’मायबोली’ का? असे विचारले आणि सर्वांनी हसत होकार दिल्यावर मग मीही पुढे होऊन ओळख करुन दिली...’मी अविकुमार’ (नाम तो सुना ही होगा...हे मी मनातल्या मनात म्हटलं!). केदार, मनिष, फार-एन्ड, मयुरेश अशी नावे सांगत सगळ्यांनी हस्तांदोलन केले. तेवढ्यात त्या सर्वांच्या तोंडावर आश्चर्यमिश्रित भाव उमटल्याचे पाहून त्या कारणाकडे नजर वळवली तर २ व्यक्ती हसतमुख मुद्रेने आमच्याकडेच चालत येत होत्या. तर अशा प्रकारे अनिलभाई यांनी या गटगला धावती भेट देऊन आश्चर्यचकीत केले. त्यांच्याबरोबरील दुसरी व्यक्ती म्हणजे मायबोलीकर श्री. विवेक देसाई असल्याचे समजले. तेवढ्यात एक दुचाकी आमच्या पुढ्यात येऊन थांबली आणि त्यावरील मुलीने आमच्याकडे हात हलवीत ’हाय’ केले. परंतू तोंडाला ’खास पुणे इश्टाईल’ने रुमाल बांधला असल्याने कुणालाच ओळख पटेना आणि सगळे गोंधळून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. गडबड लक्षात आल्याने तिने झटकन तोंडावरील रुमाल बाजूला सारला आणि ’नीधप’ कार्यक्रम स्थळी अवतरल्या. तेवढ्या वेळात अनिलभाई झटकन आपल्या कार मधे जाऊन नवीन मायबोलीचा चहासदरा घालून अवतरले. पुन्हा ओळखीचा कार्यक्रम झाला आणि खास अनिलभाईंच्या विनंतीवरून एक लहानसे ’फोटोशूट’ही तिथल्यातिथे पार पडले.

नीधप ने आदल्या दिवशीच गंधर्वमधली २० आसने राखीव करुन ठेवल्याने आसनांसाठी धावाधाव करावी लागली नाही आणि सर्व जण एक एक करीत स्थानापन्न झाले. मी केदार आनी कांदापोहेच्या (मधल्या काळात केप्याचे वाजतगाजत आगमन झाले होतेच) मधली अशी मोक्याची जागा पटकावली जेणेकरून सर्व चर्चांमधे शाब्दिक नसला तरी ’ऐकीव’ सहभाग घेता येईल. हळू हळू एक एक मायबोलीकर कार्यक्रमस्थळी अवतरू लागला तसतसा ओळखपरेड आणि गप्पांना रंग चढू लागला. मी सुध्द्धा आपल्या वकूबाप्रमाणे मधूनच गप्पांमधे उगाच एखादं वाक्य टाकून हिःही हसत होतो. मधेच माझ्या ऊसगावातून कायमस्वरुपी परतल्यानंतरचे अनुभव याविषयीच्या एका वाक्याने केदार बिथरला आणि पुन्हा असं घाबरवू नकोस अशी विनंती करून मोकळा झाला. मी मात्र मनातल्या मनात कसं फसवलं म्हणत हसत बसलो. तेवढ्या वेळात तिथे शैलजा, स्वाती व देव, रूमा, श्यामली, हिम्सकूल, किरू, आनंदसुजु, आनंदमैत्री, बागुलबुवा, देवा सुध्द्धा येऊन पोहोचले होते आणि जोरदार कल्ला चालू झाला होता. नीलवेद, इंद्रा, कौतुक शिरोडकर हे सुध्द्दा आल्याचे कळाले पण नक्की कोण आणि कुठे होते ते मला शेवटपर्यंत कळाले नाही हो. आणि याची रुखरुख अजूनही मनात आहे.

तेवढ्यात देवा आणि केदार हे साईडप्रोफाईलने सारखेच दिसतात असं कोण तरी म्हणाले म्हणुन मग आधी देवा कोण हे शोधून काढ, मग उगाच त्याच्याकडे ’तो साईड प्रोफाईल’ कधी देतोय याची वाट बघ, मग केदार चा साईड प्रोफाईल बघ, मग ’अरे हो..खरंच की’ याचा साक्षात्कार होऊन खूश हो असे उद्योग मी ’उपमा’ खाता खाता चालू ठेवले. बागूलबूवाचे फोटोसेशन सुद्धा जोरदार चालू होते. ते फोटॊ काढायला लागले की हातातला तोंडापर्यंत नेलेला उपम्याचा चमचा पटकन खाली कर, केप्याने मागवलेल्या उडिदवडयाला कुणीही वाली नसल्याचे पाहून त्या उडिदवड्याला ’उडवा’यचा प्लॆन कर आणि केपीराव तेवढ्यात तेथे उगवल्याने (किंवा कडमडल्याने म्हणा) उडदाऐवजी मूग गिळून गप्प बस असे उद्योगही गप्पा ऐकत असताना माझे एकीकडे चालूच होते.

गप्पांचे विषयही अहाहा...काय वर्णावे..... अगदी वैश्विक..... बाराकरांचे गटग, झक्की, औरंगाबादचे गेस्ट हाऊस आणि त्यातील एकंदरित (अ)सुविधा, वैभवाचा आदल्या दिवशीचा गझल कार्यक्रम ’शब्द झाले मायबाप’, त्या कार्यक्रमानंतरचे कार्यकर्त्यांचे गटग, शिकागो अधिवेशन आणि तेथल्या घडा’मोडी’!, ऊसगावातून भारतात आणण्याजोग्या वस्तू, मायबोलीवरील काही मायबोलीकर आणि त्यांच्या लिखाणाचा दर्जा ई. ई. अशा प्रकारच्या आणि इतरही अनेक विषय माझ्या ’ग्यान’ सागरात भरच घालून जात होत्या. ’नीधप’नी आणि ’केदार’नी एव्हाना गप्पांची वरची पट्टी पकडली होती आणी या सर्वांचा कळसासाध्याय म्हणजे उशिराने उगवलेल्या ’ललीता-प्रीती’. त्या अगदी थोड्या काळासाठी तिथे आल्या आणि सर्वांना आपल्या दर्शनाने पुनीत करून रवाना झाल्याही. आम्ही आपले पहातच राहीलो.

एव्हाना अनिलभाईंना पुढे गोव्याला जायचे असल्याने ते सर्वात आधी सटकले होते. त्यानंतर थोड्यावेळाने मुंबईला जाणारे ’पुणेकर’ निघाले. मग हळूहळू एकेक जण सटकू लागला. तितक्यात आम्हा सर्वांचा विरोध न जुमानता केदारने संपूर्ण उपहाराचे बील अदा केले. आणि घड्याळातले १०:३० बघत आम्हाला पण निघायचे वेध लागले. पुन्हा एकदा ’गंधर्व’ बाहेर एक उर्वरीत लोकांची लहानशी मैफल उभ्या उभ्या जमवून साधारन ११:०० वाजता आम्ही सर्व जण पुन्हा भेटन्याचे ठरवत एकमेकांचा निरोप घेतला.

---

क्षणचित्रे:

१. नीधपने इतक्या मोठ्याप्रमाणावर मायबोलीकरांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल तिचे हार्दिक आभार.
२. नीधपला एके ठिकाणी तीचा एक लेख वाचल्याची मी आठवण करुन दिली आणि उपनिर्दिष्ट लेख फार चांगला असल्याबद्दल मी तीला सांगताच ’केदार’ मात्र ’कशी जिरली ’नी’ ची’ अशा अविर्भावात खूश झाला.
३. केदार आणि मी एकाच कारखान्यात पाट्या टाकत असल्याचे निदर्शनास आले.
४. मंजात्या हे पुण्यातलं फार लाडकं व्यक्तीमत्व असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक थोड्या वेळाने त्यांच्या नावाचा उद्घोष चालू होता.
५. केदार हे बर्याचशा आर्थिक बाबीतले उत्कृष्ट जाणकार व सल्लागार आहेत. आणि फुकटात सल्ला देण्यासही ते नेहमी तयार असतात...आणि फुकटात ’खिलवण्यासही!’
६. गंधर्व मधील ’कटलेटस’ फारसे न आवडल्याने त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आले आहे.
७. माझ्या मायबोलीवरील एकंदरीत ७ वर्षाच्या कारकिर्दित(!)ला हा देशातला पहिला गटग आणि एकंदरीत दुसरा गटग होता. (हे फक्त क्षणचित्रांची एकूण संख्या वाढवण्याच्या दृष्टीने लिहिले आहे, यावर कोणत्याही खवट/खारट/तिखट प्रतिक्रियांना अनुल्लेखाने मारण्यात येईल!)
८. बर्‍याचशा गप्पा आणि त्यांचे विषय माझ्या कानांच्या टप्प्यांतून आणि बुद्धीच्या कुवतीतून राहून गेले आहेत याची मला खात्री आहेच. तरी उपस्थित मान्यवर ते सर्व इथे नक्कीच टंकतील याची खात्री मज पामरास असल्याने इतक्या उशिरानेसुद्धा वृत्तांत टाकण्याचे धाडस करीत आहे!


Wednesday, July 28, 2010

का?

हि नविन कविता तुमच्यासाठी! प्रतिसाद जरुर द्या! (मोठ्या आकारात पहाण्यासाठी कवितेवर क्लिक करा)

Tuesday, December 22, 2009

सोबती

आताशा आरशात पाहाणं मी बर्‍याचदा टाळतो, कारण...
समोर काय दिसणार याचा चोरटा हिशेब,
मनाने आधीच कुठेतरी करुन ठेवलेला असतो...

तरीही व्हायचं तेच होतं,
नेहमीच्याच सवयीनं, अनावधानानं
आरशाकडे लक्ष जातं...
आणि मग समोर
नेहमीचंच चित्र उभं रहातं...

दिसतोच शेवटी तो वठलेला एकलकोंडा वृक्ष...
एकेकाळच्या भव्यतेच्या खुणा
अंगाअंगावर मिरवणारा...
आणि आता स्वतःच्या अस्तित्वासाठीच
केविलवाणी झुंज देणारा...

त्याच्या अंगाखांद्यांवर वाढलेल्या पक्षानंही
आता दुसरीकडे बिर्‍हाड मांडलंय..
आणि त्यानंही एव्हाना सवयीनं,
ते हताशपणे स्विकारलंय....

खुद्द धरणीमातेनंच झिडकारल्याचा घाव मात्र
त्याच्या उरल्यासुरल्या फांद्यांतून,
शेवटर्यंत सलणार बहुतेक...

घायाळलेलं मन त्याचं,
एकाकीपणाच्या सरणावर,
शेवटपर्यंत जळणार बहुतेक...

आणि,
तरीही सोबतीच्या आशेने,
अस्तित्वाच्या मृगजळामागे तो,
शेवटपर्यंत पळणार बहुतेक....
........
...........

आताशा आरशात पाहाणं मी कटाक्षानं टाळतो, कारण...
जर तो वृक्ष पुन्हा दिसलाच नाही, तर....
माझे अस्तित्वच उन्मळून पडेल,
सोबत्याविना सरणावर एकाकी असल्याच्या जाणीवेने......
सोबत्याविना सरणावर एकाकी असल्याच्या जाणीवेने......

Tuesday, May 19, 2009

धमाल टेक्सास ए.वे.ए.ठि. वृत्तांत - एक संस्मरणीय अनुभव!

ए.वे.ए.ठि. = एकाच वेळी एकाच ठिकाणी.
मायबोली = मा.बो. = www.maayboli.com
दिवसः मिती वैशाख शुक्ल ८ शके १९३१, शनिवार दिनांक २ मे २००९ रोजी
ठिकाण - ह्युस्टन (टेक्सास)
-------------

जसजसं ह्युस्टन मागे पडत होतं तसतसे मनातले आठवणींचे तरंग अधिकाधिक गहिरे होत होते. टेक्सासबाफ ला आम्ही सगळे श्रावणबाफ म्हणतो. श्रावणात जसे 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असतं, तसंच टेक्सासबाफवर कधी पोस्टांचा पाऊस तर कधी मंदारची 'सुप्रभाति' पोस्ट सोडून काहीच नाही, असा श्रावणी ऊनपावसाचा खेळ चालू असतो. म्हणूनच ए.वे.ए.ठि. ला 'मेंबरां'च्या उपस्थितीचा दुष्काळ जाणवण्याची शक्यता गृहित धरुन निघलेला मी, टेक्सासकरांच्या अविश्वसनीय प्रतिसादाच्या, आदरातिथ्याच्या, अवखळपणाच्या, अगत्यशीलतेच्या अशा अगणित आठवणी मनात साठवूनच परतीच्या प्रवासाला लागलो होतो......

अरे अरे मंडळी, लगेच उठून जायला नका लागू हो... सांगतो की बैजवार तुम्हाला सगळं...जरा या इकडे असं टेक्सासबाफवर.... हां अस्संऽऽ... हाच तो बाफ जिथे एक आठवड्यापूर्वीपर्यंत गटगच्या चर्चा अगदी चवीनं चघळल्या जात होत्या. काहीजणांना वाटलंही असेल कि हे सगळं नुसतं बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.. त्या 'काही'जणांमधलाच मी पण एक होतो. पण जसं माझं देशात कायमचं परतण्याचं नक्की झालं तसं वाटलं की एकदातरी गटग झालंच पाहिजे. मग भले २ सदस्य का उपस्थित असेनात. आणि मग साशंक मनाने का असेना, पण बीबीवर जाहीर करुनच टाकलं की येत्या सप्ताहांताला (शनिवार, दि. २ मे) मी ह्यूस्टनमुकामी ए.वे.ए.ठि. साठी येतो आहे.

आता मंडळी तुम्ही म्हणाल, 'हे ह्यूस्टनच का रे बाबा ठरवलंस?'. म्हणा की. तर त्याचं असं आहे की टेक्सासबाफवर मुख्यतः दोन ठिकाणचे मायबोलीकर उपस्थित असतात... ह्यूस्टन आणि डल्लास. मी आणि सीमा असे दोघे डल्लासचे सदस्य सोडल्यास बाकी सगळी मंडळी ह्यूस्टनची.... मंदार, आशी, साज, रिमझिम. मग कमीत कमी एकातरी महानुभावाची उपस्थिती राहिल असा सुज्ञ (!) विचार करुन ह्यूस्टन नक्की केलं हो!

तर हे असं ए.वे.ए.ठि. जाहिर होताच टेक्सासवर पोस्टांचा हलकासा पाऊस सुरु झाला. आशी आणि मंदारनं ही कल्पना लगेच उचलून धरली तसा थोडा धीर आला. बाफवर चविष्ट (आणि पाणचट!) गप्पांना ऊत आला. मी आणि मंदारनं प्रस्तुत केलेला चमचमीत जेवणाचा बेत आशीनं माझ्या अल्सरचं निमित्त करुन असा काही हाणून पाडला की ज्याचं नाव ते. त्याच वेळी आशी मुगाच्या खिचडीचा कट करते आहे असं दिसताच मी जोरदार विरोध करुन त्या 'कटा'ची आमटी करुन टाकली. माझ्या भाकरीच्या फर्माईशीला आशीनं ती कोकणात कशी एका दिवसात ५० भाकर्‍या करते याचं रसभरीत उत्तर दिल्यानं, ए.वे.ए.ठि. च्या दिवशीच्या एकंदरीत प्रतिकूल घटनांचा ल्.सा.वि. काढूनही माझ्या वाट्याला २ तरी भाकर्‍या येतील अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत करुन घेतली. समजूतच म्हणा ती. ऊसगावात भाकरी पहायचंही नशीबात नसलं तर खायच्या गोष्टी करुन काय उपयोग, हे माझ्या 'भाबड्या' मनाला कसलं समजतंय! असो. मंदारच्या डोक्यावर पुरणपोळीचा भार टाकायचा मी आणि सचिनने प्रयत्न करताच असा काही गायब झाला की स्वारी दुसर्‍या दिवशीच 'सुप्रभाता'ला उगवली!

या पु.पो. च्या (पु.पु.च्या नव्हे! संबंधितांनी गैरजमज करुन घेऊ नये) आणि मुगाच्या गरमागरम चर्चेवर मुग गिळून गप्प बसतिल ते मा.बो.कर कसले. तर या ही चर्चेत वेळोवेळी तेल आणि कधी कधी पाणीही ओतण्याचे महान कार्य सचिन, रुनी, उपास यांनी यथासांग पार पाडले.

होता होता शुक्रवार उजाडला. पण इच्छूकांचा आकडा काही पुढे सरकेना... मी, आशी आणि मंदार. सीमाचं लवकरच देशात सुट्टीवर जायचं घाटत असल्याचं तिनं मला ई-पत्रातून कळवलं तेव्हा तिला ए.वे.ए.ठि. ला उपस्थित रहाण्याच्या माझ्या आग्रहावर 'सीमा' आल्याचं मला जाणवलं आणि एक उपस्थित गळाला. राहाता राहीले रिमझिम आणि साज. रिमझिमची परिक्षा सुरु असल्याने तशीही तिची बाफवरची पोस्टांची उपस्थिती मूसळधारहून 'रिमझिम्'पर्यंतच सिमीत झाली होती. साजचं कन्यारत्न 'ईशानी' हिच्या तब्येतीच्या तक्रारी चालू असल्याने ती सुद्धा साशंकच होती. पण मंदार आणि आशी त्यांच्या ऊपस्थितीबद्दल बरेच ठाम असल्याने मी अजूनही आशावादी होतो.

तर मंडळी, अशाप्रकारे शनिवारी पहाटे ६ वाजता निघून मी आणि माझा मित्र भूषण ११-१२ वाजेपर्यंत ह्यूस्टनला पोहोचायचं असं ठरलं. 'ठरलं एकदाचं' असं म्हणा हवं तर!

पहाटे ५ चा गजर घड्याळात लावून मी झोपलो खरं पण उशिरापर्यंत झोपण्याची वाईट सवय ईथेही आडवी आली. पहाटे बराचवेळ आकांडतांडव करून घड्याळाच्या गजराने आमच्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि बिचारा शांत झाला. ईकडे माझे डोळे 'भल्या पहाटे' ७ वाजताच ऊघडले आणि शॉक लागल्यासारखा मी बिछान्यातून टुनकन ऊडालो. तिकडे भूषणमहोदयांचीही अशीच काहिशी अवस्था होती. शेवटी ८ वाजता धावत पळत तयार होत ह्यूस्टनच्या दिशेने प्रस्थान ठेवले...... बाहेर थंड हवा, ढगाळ वातावरण आणि गाडीमधे आदल्या रात्री नव्यानेच बनवलेल्या सीडीमधली वाजणारी सुमधूर गाणी यामूळे मन कसं एकदम उत्साही होतं.

तर मंडळी, अशा प्रकारे गाणी ऐकत, गप्पा मारत आमचा प्रवास गटगच्या दिशेने पुढे सरकत होता!

आदल्या दिवशी फोनवरील संभाषण अर्धवट सोडून पळालेल्या मंदारला साधारणतः सकाळी १० वाजता जाग आली म्हणून की काय, माझा भ्रमणध्वनी किणकिणला आणि मंदारभाव फोनवर अवतरले. घरातल्या पाहूण्यांचे कारण पूढे करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आमचे प्रवासाचे हालहवाल जाणून घेऊन स्वारी गायबली.

मस्त रमत गमत, गप्पा मारत, रस्ता चुकत, गाणी ऐकत आम्ही ह्यूस्टनजवळ येऊन पोहोचलो तसं आधी ठरवल्याप्रमाणे आशीला फोन केला. पण ४-५ वेळा प्रयत्न करुनही उत्तर काही मिळेना तेव्हा 'अजून एक मेंबरानं डच्चू दिला की काय' अशी शंका मनात चमकून गेली. पण सुदैवाने, घरच्या फोनऐवजी भ्रमणध्वनीवर प्रयत्न केल्यावर फोन उचलला गेला आणि...........आशी तिकडून 'आशी'काही बरसली कि बस्स्...ती म्हणे माझा फोन सकाळपासून ट्राय करत होती आणि मीच उचलत नव्हतो. तिने 'आवाजी संदेश'ही ठेवला होता म्हणे माझ्यासाठी. पण माझ्या भ्रमणध्वनीतून तर कसलाच आवाज आला नव्हता. तेव्हा तिच्याकडून माझा भ्रमणध्वनी क्रमांक वदवून घेतल्यावर खरी 'ग्यानबाची मेख' माझ्या ध्यानात आली. अस्मादिकांनी घाईघाईत 'ध' चा 'मा' केला होता. क्रमांकामध्ये ५ च्या ऐवजी २ लिहिण्याची एक 'लहान'शी चूक आम्हाला भोवली होती. असं हसायचं नाही काही मंडळी, चूक माणसाकडुनच होते ना? (बाईमाणसाकडून चूक होते असे म्हणण्याची हिंमत अजून तरी माझ्यात आलेली नाहिये!)

पण तशाही परिस्थित कोणा पामराच्या फोनच्या 'आवाजी संदेशात' आशीने 'आवाज' काढला असेल आणि तो ऐकून सदर व्यक्तिचा चेहरा कसा पहाण्यालायक झाला असेल याची कल्पना करुन येणारे हसू मी महत्प्रयासाने आवरले. तो पर्यंत आशीबाई बर्‍याच शांत झाल्या होत्या. त्या त्यावेळी स.कु.स्.प. बँकेत गेल्याचे कळल्याने तिकडेच भेटून पुढच्या योजना ठरवूयात असे ठरले म्हणून आम्ही बँकेच्या दिशेने निघालो. मधल्या वेळात मी साज ला बर्‍याचवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन सरळ सरळ बंद होता! त्यामूळे 'साज काही येत नाही आज' असे वाटले.

ठरल्याप्रमाणे येऊन पोहोचलो आणि त्या नंतर दोनच मिनिटांत आशी, त्यांचे उत्तमार्धांग श्रीयुत आशिष आणि सुपुत्र 'अर्णव' यांचे आगमन झाले. मला तेवढ्या वेळात जरा फिरकी घ्यावी असे वाटून गेले म्हणून भूषण ला 'अविकुमार' बनण्यास सांगून मी स्वतः 'भूषण' बनलो. त्या प्रमाणे आम्ही आमच्या ओळखी करुन दिल्या. त्यामूळे माझ्याकडे पुर्णतः दूर्लक्ष करुन आशी भूषणलाच मंदार आणि बाकी सगळ्यांबद्दल विचारायला लागली. थोड्याच वेळात भूषण साहेबांना ते नाटक वठवणे अवघड जाऊ लागले आणि मग मी 'कशी गम्मत केली'च्या 'अवि'र्भावात खर्‍या अविची (म्हणजे अस्कादिकांची हो मंडळी!) ओळख करुन दिली. आशिषला आम्ही खरे तर पहिल्यांदाच भेटत होतो पण तरिही त्याच्या लाघवी आणि मोकळ्या स्वभावामूळे आम्ही सगळे खूप पुर्वीपासूनची ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारायला लागलो.

आता मुख्य काम होते ते मंदारशी कुठे आणी कसे भेटायचे ते ठरवणे. त्या प्रमाणे मंदारला फोन केला तर पठ्ठ्याने रिमझिमलाही फोनवर घेतले होते. ती सुद्धा सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक होती आणि परिक्षा असूनही वेळात वेळ काढून येता येतं का ते पहात होती. फक्त तिचे घर सर्वात दूर असल्याने कोणतेतरी मध्यवर्ती ठिकाण ठरवावे लागणार होते. हे ऐकूण मला आणखी हूरुप आला. आणखी एक मेंबर वाढला की हो मंडळी! आता फक्त साज राहिली होती. मी पुन्हा तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण.. व्यर्थ.

दरम्यान चि. अर्णव आम्ही उभे असलेल्या दुकानाच्या स्वयंचलित दरवाजाची कार्यक्षमता वारंवार तपासून पहात असल्याचे आशिषच्या लक्षात आल्याने इथून लवकरच काढता पाय घ्यावा असे त्याने आम्हाला सूचवले. एव्हाना सर्वानुमते असे ठरले होते की, मी, भूषण, आशी, आशिष आणि मंदार आधी कोणत्या तरी 'हाटिलात' भेटून दूपारचे भोजन उरकून घ्यावे आणि मगच रिमझिमला भेटायला एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जावे. त्या नुसार आम्ही 'क्ले पॉट' नामक हाटिलाकडे मोर्चा वळवला. मंदारला यायला थोडा वेल होता. चि. अर्णवला भूक लागली असल्याने त्याला आधी भोजन करवले पाहीजे या हेतूने मंदारची वाट पहात बाहेर थांबलेले आम्ही सर्व आतमध्ये गेलो खरे, पण आतल्या पदार्थांच्या घमघमाटाने आमच्या पोटातल्या उंदरांच्या उड्यांचं अनुक्रमे कावळ्याच्या कावकावमध्ये आणि लगेच वाघाच्या डरकाळ्यांमधे रुपांतर झाले. मंदार तर अजूनही आला नव्हता. पण तितक्यात.. आशिषला एक नामी युक्ती सुचली बरं का मंडळी!..मंदार येईपर्यंत आपण फक्त स्टार्टर्स चालू करुयात म्हणजे मेन कोर्स चल्लू न केल्याने योग्य ते औचित्य साधले जाईल! .....आणि मग...पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही स्टार्टर्सवर तुटून पडलो!

यथावकाश म्हणजे ५ मिनिटांतच मंदार आणि त्यांचे उत्तमार्धांग सौ.अपर्णा यांचे आगमन झाले. आम्ही 'नामांतराची' नेहमीची यशस्वी युक्ति मंदारवर आजमावण्याचा प्रयत्न केला पण... पण तो साफ अयशस्वी ठरला. मंदारने मला बरोब्बर ओळखले. मी कधी काळी माझा 'फोटू' मा.बो. वर लावला होता तो पाहिल्याचे त्याला पूसटसे आठवत होते म्हणे!

मग काय...जेवणाबरोबरच गप्पांना उधाण आले. मंदार पूर्वी बा.रा.च्या ए.वि.ए.ठि.ला हजर असल्याचे कळले. साहजिकच गप्पांचा रोख झक्की, विनय, मृ. ई. कडे वळून आला. तसेच बोलण्याच्या ओघात उपस्थित बरेच जण हे 'विशिष्ठ शहरातले' किंवा जिल्ह्यातले असल्याचे स्पष्ट झाले. मधेच मंदारला पु.पो.ची आठवण करुन दिल्यावर 'करुण' चेहर्‍याने' आणि पु.पु. बाण्याने त्याचे उत्तमार्धांग आजूबाजूला नाही याची खात्री करुन घेत, ती फर्माईश थेट सौ. अपर्णाकडेच करण्याचा 'भयानक' प्रेमळ सल्ला दिला. स्वतःचा जीव वाचवून माझा जीव धोक्यात घालण्याचे मंदारचे कॄत्य मला बिलकूल रुचले नाही आणि म्हणूनच मी 'मला पु.पो. फारशी आवडत नाही' असे सांगून कशीबशी वेळ मारुन नेली. स्वतः मरण्यापेक्षा वेळ मारलेली बरी... नाही का हो मंडळी! मधेच मंदारने त्याला मिळणार्‍या सुट्ट्या या विषयाचे गोडवे गाऊन सगळ्यांची गोड खीर आंबट करुन टाकली. आणि बदल्यात तीळ - पापडही खाऊ घातले.

गप्पा मारता मारता असेही कळले की, मी आणि मंदार दोघेही अजून महिनाभरात एकाचवेळी पुण्यात असू. तेव्हा पु.पु.बरोबरही एक ए.वे.ए.ठि. करता येईल. याबाबतीत मंदार थोडा साशंक होता.त्याचं म्हणनं पदलं की आपण काय झक्कीकाकांसारखे उत्सवमूर्ती (पक्षि सेलिब्रेटी) थोडेच आहोत? पण मी बराच सकारात्मक होतो... अजुनपर्यंतचा अनुभव आणि काय... म्ह्टलं बघु...आले तर ठीक नाही तर......आपण दोघे आहोतच की.. दोघांचेच ए.वे.ए.ठि. करुन टाकू... हा.का. ना. का.!

गप्पांच्या नादात जेवण जरा (?) जास्तच झाले. साधारणतः दुपारचे ३ आणि पोटाचे १२ वाजत आले होते. म्हणून मग पुढचा कार्यक्रम ठरविण्यासाठी मंदारने रिमझिमला फोन लावला. मग मी पण साजला पुन्हा संपर्क करण्याचा प्रायास करुन पाहिला. आणि..... अहो आश्चर्यम! फोन चक्क दस्तुरखुद्द साजने उचलला. चुकीचा फोन नंबर दिल्यामुळे आशीने दिलेला आहेर मी साभार साज पर्यंत पोहोचवून टाकला. तिच्याकडून कळले की कन्यारत्नाची तब्येत अजूनही नरमच असल्याने तिचे येणे अवघड आहे. तरिही, रिमझिमला भेटण्यापूर्वी एकदा साजकडे जाऊन यावे असे ठरल्याने आम्ही आधी आशीच्या घरी आणि नंतर साजकडे जायचे नक्की केले. खाणावळीचे सर्व बिल आमच्या आग्रहाला न जुमानता आशिष ने देऊन टाकले आणि आमचा मोर्चा आशीच्या घरी जाऊन विसावला.

आता आशिष , मंदार, आणि अपर्णा यांना चहाची चांगलीच तल्लफ आली होती. त्यामूळे वेळ वाचवण्यासाठी साजकडे गप्पा मारता मारता चहाची फर्माईश करण्याचे ठरले आणि आम्ही निघायची तयारी केली. पण सगळेजण आपल्या घरी आले आणि काहीही न घेता निघाले हे आशिषच्या मनाला पटेना. त्यामुळे मग नाईलाजाने (!!!) आशीने अल्पोपहार पेश केला पण सगळ्यांची पोटं तुडुंब भरली असल्याने आशिषचे मन राखण्यासाठी म्हणून थोडंसं काहिबाही पोटात ढकलून सगळे जण साज कडे निघालो.

साजचं अपार्टमेंट म्हणजे एक मोठा भूलभूलैयाच होतं. किंवा अली बाबाची गुहा म्हणा. लहानपणीच्या चोरपोलिस (वेगवेगळ्या खूणा ओळखून चोर पकडणे) खेळाची तीव्रतेने आठवण झाली. चालत चालत एका बोळातून दुसर्‍या बोळात घर शोधताना सगळ्यांनाच मजा यायला लागली होती. मला एखादं म्यूझियम पहात असल्याचा भास झाला. एका ठिकाणी तुरुंगाला असतात तसे उभे बार लावले होते आणि त्या बारकडे जाणारा बाण दाखवून घरावी दिशा प्रदर्शित केली होती. आत या बारमधून कसं जायचं असा प्रश्न मंदारच्या बालसूलभ बुद्धीला न पडतो तरच नवल! पण तेवढ्यात मी दुसरा रस्ता शोधून काढला म्हणून बरं नाही तर मंदारच्या आग्रहाखातिर त्या बार मधून मधून जाव लागलं असतं सगळ्यांना. सगळे जण गेलेही असते हो बारमधून आरामात, पण मला माझ्याच बाबतीत शंका असल्याने मी पटकन दूसरा रस्ता शोधण्यावर भर दिला होता. असो. करता करता शेवटी शेवटच्या बोळात येऊन पोहचलो. तर मंदारची बालसुलभ बुद्धी परत जागृत! "शेवटच्या बाणापर्यंत पोहोचल्यावर 'कसं फसवलं' असं लिहिलेलं आढळलं तर काय?". मी आपलं असोशीनं तिकडं दुर्लक्ष करत (खरं तर मनातल्या मनात हसू आवरत) पुढे झालो.

दरवाजावर आवाज केल्यावर दरवाजा एका लहानशा मुलीनं उघडला. मनात म्हटलं की, अरे साजची मुलगी बरीच मोठी आहे की!. पण मग हिच 'साज' असं समजल्यावर 'मुग' गिळून गप्प बसलो. सगळी कंपनी घरात स्थिरस्थावर झाल्यावर 'ओळखा पाहू कोण आम्ही?' हा खेळ खेळण्यात आला. राज्य अर्थातच साजवर होतं. पण साजनं जवळजवळ सगळ्यांना बरोब्बर ओळखलं... सगळे जण बसलेच होते तसे..... जवळजवळ!!! मला तर साजनं आरामात ओळखलं कारण तीने माझ्या ऑर्कूटवरच्या प्रोफाईलला आधीच भेट देऊन ठेवली होती. अस्सं आहे होय ते.. बऽऽरं बऽऽरं....!!!

आधी ठरवल्याप्रमाणे साजला चहाची फर्माईश केली तिने सगळ्यांना खीर खाण्याचा प्रेमळ आग्रह केला. आम्ही तो आग्रह आमच्या तुडूंब भरलेल्या पोटांच्या काळजीने साभार परतवून लावला. आणि रिमझिमकडे जायला उशिरही होत असल्याने जरा घाई करावी लागणार होती. तेवढ्यातच साजचे उत्तमार्धांग श्रीयुत परागचे आगमन झाले. सगळ्यांशी ओळखी करुन घेत परागही गप्पांमधे मिसळून गेला. पण आशिष आणि मंदारला चहाची तल्लफ काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती.... म्हणून पुन्हा चहाचा आग्रह्....त्यावर साजचा पुन्हा खिरीचा आग्रह....त्यावर पुन्हा सगळ्यांचा साभार नकार.. पुन्हा रिमझिमसाठी घाई...!!
शेवटी रिमझिमला भेटल्यावरच चहा घेऊ असं ठरलं. पराग आणि साज यांनी चर्चा करुन आमच्याबरोबर यायचा अनपेक्षित आणि आनंददायक निर्णय घेतला आणि साज कु. ईशानीची आवराआवर करायला पळाली. आवराआवरी करुन १०-१५ मि. मध्ये आम्ही सगळे निघालो... बरोबर चहासाठी तरसलेले अतृप्त आत्मे घेऊनच!!!

साजच्या या खिरीच्या आग्रहाचे कारण दुसर्‍या दिवशी तिच्याशी फोनवर बोलताना कळाले. सगळे जण घरी येणार म्हणून तीने मोठ्या कष्टाने घाऊक प्रमाणात अवघ्या अर्ध्या तासात खीर बनवून ठेवली होती. आणि कोणीच त्या खीरीची चवही न चाखल्याने आता पुढील काही दिवस पराग आणि साजला ती खीर गोड मानून घ्यावी लागणार होती.

तर मंडळी, अशाप्रकारे १००% ह्युस्टनवासी मा.बो.करांची उपस्थिती अगदी अनपेक्षितरित्या पक्की झाली!

ठरल्याप्रमाणे सगळा मोर्चा पुर्वनिश्चित ठिकाणी पोहोचला आणि लवकरच रिमझिमचे त्यांचे उत्तमार्धांग श्रीयुत शैलेश आणि कन्यारत्न कु. वेधा यांच्यासह आगमन झाले. आणि मग तिच्या अपर्णा आणि मंदारशी गप्पा सुरु झाल्या. आम्हीपण तोपर्यंत शैलेशशी ओळख करुन घेऊन गप्पा मारायला लागलो. पण रिमझिमसाठी मात्र आम्ही जणू त्या गावचेच नव्हतो. मग आम्ही सगळे 'ला मेडलीन' नामक फ्रेंच हाटिलात गेलो. तिथे बराच वेळांनंतर सगळ्यांशी गप्पा झाल्यावर आणि आम्हाला बर्‍यापैकी अनुल्लेखाने मारुन झाल्यावर रिमझिमला आम्हा आगंतुकांची आठवण झाली आणि मग माझ्याकडे आणि भूषणकडे पाहून शेवटी बाईंसाहेबांनी प्रश्न विचारला....'तुमच्या पैकी अविकुमार कोण?' मी शांतपणे भूषणकडे बोट दाखवले. तर बाईसाहेब फक्त 'अच्छा अच्छा' म्हणून गप्प! मग म्ह्टले जाऊदे आपणच ओळख करुन देऊ आणि पुन्हा नव्याने करी ओळख करुन दिली तरी बाईसाहेब पुन्हा... 'अच्छा अच्छा' म्हणून गप्प! मग आम्हाला पुन्हा 'मूग' गिळावे लागले.

थोड्यावेळातच सगळे स्थानापन्न झाले आणि मग मात्र गप्पा टप्पा, खान्-पान जोरात चाली झाले. कु. वेधा ही मायबोलीची टोपी घालून आल्यानं 'वेधा' हिच एकमेव अधिकृत मायबोलीकर हजर असल्याचं आशिषचं मत पडलं! सगळ्यांचं खान्-पान चालू असताना मी आणि भूषण मात्र फक्त 'आंब्याचा चहा' मागवून स्वस्थ बसलो होतो. पण सगळ्यांचं खाणं संपलं तरिही आम्हाला काही 'आंबा चहा'चं दर्शन झालं नाही. यांनी खास रत्नागिरीहून आंबा आणि आसाम मधून चहा मागवलाय की काय इतपत शंका आल्यामूळे चौकशी केल्यावर असे निष्पन्न झाले की 'आंबा चहा' नामक प्रकार आपण स्वतःच मशिन मधून (गाळून?) आणायचा. भूषणने 'टी' जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि दोन ग्लास भरुन चॉकलेटी रंगाचा आंबा चहा घेऊन आला. आम्ही मोठ्या आशीनं.. आपलं.. आशेनं पहीला घोट घेतला आणि भूषणनं पठ्ठ्यानं 'आंबा चहा' ऐवजी 'कारला चहा' आणला की काय अशी 'टी'व्र शंका येऊन गेली. शेवटी दुसरा घोट न घेता त्या चहाला मी आणि भूषणनं अनुल्लेखानं मारलं!

रिमझिम ही उपस्थितांमधील सर्वात सिनिअर मायबोलीकर असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. मी या सन्मानासाठी फक्त काही आठवडे कमी पडलो. पण माझे मा. बो. चे नोंदणी करण्यापुर्वीचे रोमातले महिने धरुन तो सन्मान मनातल्या मनात स्वतःला देऊन टाकला.... !!! तर अशा प्रकारे बर्‍याच जिव्हाळ्याच्या गप्पा, खानं-पिनं होऊन सर्वांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मी आणि भूषण आशीबरोबर तिच्या घरी रात्रीच्या मुक्कामाला पोहोचलो.

दिवसभराच्या दगदगीनंतरही आशीनं थोड्याच वेळात स्वादिष्ट स्वयंपाकाचा जंगी बेत केला. आणि तोही अगदी थोड्याच वेळात. त्यातही मूगाचे वरण बनवून तिने अप्रत्यक्षरित्या मला मूग खाऊ घालण्याचा मनसूबा तडीस नेला. आशिष तर काय...रसिक माणूस.. त्यामुळे जेवणाचा बेत साग्रसंगीत आणि हसत खिदळत पार पडला. रात्री उशिरा कधी तरी १२-१२:३० वाजता निद्रादेवीच्या आधिन झालो. दुसर्‍या दिवशी सकाळी आशीने बनवलेले चमचमीत चहा-पोहे खाऊन आणि आशि-आशिष्-अर्णवचा प्रेमळ निरोप घेऊन परतीच्या रस्त्याला लागलो.

जसजसं ह्युस्टन मागे पडत होतं तसतसे मनातले आठवणींचे तरंग अधिकाधिक गहिरे होत होते. टेक्सासबाफ ला आम्ही सगळे श्रावणबाफ म्हणतो. श्रावणात जसे 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असतं, तसंच टेक्सासबाफवर कधी पोस्टांचा पाऊस तर कधी मंदारची 'सुप्रभाति' पोस्ट सोडून काहीच नाही, असा श्रावणी ऊनपावसाचा खेळ चालू असतो. म्हणूनच ए.वे.ए.ठि. ला 'मेंबरां'च्या उपस्थितीचा दुष्काळ जाणवण्याची शक्यता गृहित धरुन निघलेला मी, टेक्सासकरांच्या अविश्वसनीय प्रतिसादाच्या, आदरातिथ्याच्या, अवखळपणाच्या, अगत्यशीलतेच्या अशा अगणित आठवणी मनात साठवूनच परतीच्या प्रवासाला लागलो होतो......

Tuesday, May 12, 2009

कितीदा....?

वेदनांच्या सरणावरती, मी जळलो कितीदा
संवेदनांना तुझ्या तरी, मी कळलो कितीदा?


प्रेमविरोधी दळण दळले आजवरी, पण हरलो
बघता बघता जात्यामध्ये, मी आदळलो कितीदा


मनमोहक तुझ्या अदांवरी, भाळलो नित्य असा
तोल दिलाचा जाता जाता, मी सांभाळलो कितीदा


जळलो, संपलो कधीचा, त्या प्रिती कटाक्षाने
नयनी तव सामावण्या, मी ’काजळ’लो कितीदा


संध्यावेळी वळलो तुजला, निरोप द्यायला जेव्हा
विरहाने तुझ्या सखे, बघ, मी मावळलो कितीदा

-- अविनाश

Monday, August 18, 2008

भूल

भूल

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे

आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले
तमा कुणाला जो तो, स्वत:मध्ये मश्गूल आहे

जाळुनी जन्मभरी स्वत:ला, भाजली रे भाकरी
प्रितभरल्या फुंकरीला तरसे, मी विझणारी चूल आहे...

अर्पिले सर्वस्व तुजला, वसविले मनमंदिरी
हात नाही जोडले, हीच माझी भूल आहे?

- अवि

Saturday, April 26, 2008

व्यथा

व्यथा व्यर्थ मनीच्या, कुणा मी सांगणार नाही
हरलेला डाव आता, पुन्हा मी मांडणार नाही

वेडा म्हणा कुणी, मज म्हणा कुणी अभिमानी
पायी उगाच तुमच्या, असा मी रांगणार नाही

घरभेदी म्हणती आप्त, या विभिषण धर्माला
रक्त तुजसाठी तरी, रावणा, मी सांडणार नाही

तुडवतील सहजा सहजी, ते कोवळ्या भावनांना
लक्तरे वेदनांची वेशी, अता मी टांगणार नाही

भोगीन भोग सारे, मी पुण्य सारे विसरुनी
सावळ्या हरीशी तरी, बघा, मी भांडणार नाही

--अवि

Monday, March 17, 2008

प्रेमदिन

प्रेमदिन

रम्य संध्याकाळच्या आपल्या भेटी
सखे मला अजुनही आठवतात
तुझे ते निरागस हसु आठवताना
हळुच माझा गळा दाटवतात

हसत हसत विचारलेले तुझे प्रश्न
ह्रुदयात प्रेमाचे काहुर माजवतात
तिरपा कटाक्ष टाकत दिलेली उत्तरे
तुला अजुनही तितकेच लाजवतात?

थरथरणारे तुझे धुंद श्वास
भोवताली माझ्या जाणवत रहातात
अन राहुन राहुन तुझ्या आठवाने
पापण्यांच्या कडा पाणवत रहातात

तुझ्या प्रितीची मुक साद
सखे मला कळते आहे
माझेही वेडे मन
तव भेटीलागी तळमळते आहे

शहरांत असो अंतर कितीही
मनाने आणखी जवळ येऊया
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....
आजचा हा प्रेमदिन सखे
प्रेमानेच आपण साजरा करुया....

--- अविनाश

Wednesday, October 31, 2007

चिरा

चिरा

‌ऋतुमागूनी जाती ‌ऋतु, सर्वस्व परी तुज वाहीन मी
होऊनी निष्पर्ण पिंपळ, बहरता तुज पाहीन मी

दुरावलो जरी आज तुजला, रोष नाही सखे तुजसवे
वेदनांचे घनवादळ झेलित, एकटाच मूक साहीन मी

गुन्हा काय अन अपराध कुणाचा, अर्थ न उरे त्यास काही
मीच इथला फिर्यादी तरी, जामीन तुज राहीन मी

उन्मळून पडलो आज, अन जाहलो बेचिराख जरी
होऊनी खग नवफिनिक्स, पुन्हा उडुन दाविन मी

यशशिखरावरी जल्लोषामध्ये, विसरशिल तु मजला
मनमंदिराच्या पायरीशी तुझिया, एक चिरा प्राचिन मी.....

- अवि

वेदना

वेदना

ढाळू नकोस अश्रु, जरी त्यांसी मोल आहे
तव मधुर हास्य सखे, मजसाठी अनमोल आहे....

तुझ्या मनीची व्यथा, जाणतो मी प्रिये
कसे समजाऊ तुला, इथे तोच माहोल आहे....

असह्य यातना अशा, तुझ्या विरहाच्या किती
तव नयन बाणांचा, हा घाव खोल आहे....

आठवणींचा प्रवास असा, करतो पुन्हा पुन्हा
जाणार तरी कुठे मी, ही धरणी गोल आहे....

मनोमनी सहजीवनाचे, सुखचित्र मी रेखाटतो
प्रितीविना व्यर्थ सारे, सारे कवडीमोल आहे....

--- अविनाश पेठकर

Monday, July 16, 2007