Tuesday, May 19, 2009

धमाल टेक्सास ए.वे.ए.ठि. वृत्तांत - एक संस्मरणीय अनुभव!

ए.वे.ए.ठि. = एकाच वेळी एकाच ठिकाणी.
मायबोली = मा.बो. = www.maayboli.com
दिवसः मिती वैशाख शुक्ल ८ शके १९३१, शनिवार दिनांक २ मे २००९ रोजी
ठिकाण - ह्युस्टन (टेक्सास)
-------------

जसजसं ह्युस्टन मागे पडत होतं तसतसे मनातले आठवणींचे तरंग अधिकाधिक गहिरे होत होते. टेक्सासबाफ ला आम्ही सगळे श्रावणबाफ म्हणतो. श्रावणात जसे 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असतं, तसंच टेक्सासबाफवर कधी पोस्टांचा पाऊस तर कधी मंदारची 'सुप्रभाति' पोस्ट सोडून काहीच नाही, असा श्रावणी ऊनपावसाचा खेळ चालू असतो. म्हणूनच ए.वे.ए.ठि. ला 'मेंबरां'च्या उपस्थितीचा दुष्काळ जाणवण्याची शक्यता गृहित धरुन निघलेला मी, टेक्सासकरांच्या अविश्वसनीय प्रतिसादाच्या, आदरातिथ्याच्या, अवखळपणाच्या, अगत्यशीलतेच्या अशा अगणित आठवणी मनात साठवूनच परतीच्या प्रवासाला लागलो होतो......

अरे अरे मंडळी, लगेच उठून जायला नका लागू हो... सांगतो की बैजवार तुम्हाला सगळं...जरा या इकडे असं टेक्सासबाफवर.... हां अस्संऽऽ... हाच तो बाफ जिथे एक आठवड्यापूर्वीपर्यंत गटगच्या चर्चा अगदी चवीनं चघळल्या जात होत्या. काहीजणांना वाटलंही असेल कि हे सगळं नुसतं बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.. त्या 'काही'जणांमधलाच मी पण एक होतो. पण जसं माझं देशात कायमचं परतण्याचं नक्की झालं तसं वाटलं की एकदातरी गटग झालंच पाहिजे. मग भले २ सदस्य का उपस्थित असेनात. आणि मग साशंक मनाने का असेना, पण बीबीवर जाहीर करुनच टाकलं की येत्या सप्ताहांताला (शनिवार, दि. २ मे) मी ह्यूस्टनमुकामी ए.वे.ए.ठि. साठी येतो आहे.

आता मंडळी तुम्ही म्हणाल, 'हे ह्यूस्टनच का रे बाबा ठरवलंस?'. म्हणा की. तर त्याचं असं आहे की टेक्सासबाफवर मुख्यतः दोन ठिकाणचे मायबोलीकर उपस्थित असतात... ह्यूस्टन आणि डल्लास. मी आणि सीमा असे दोघे डल्लासचे सदस्य सोडल्यास बाकी सगळी मंडळी ह्यूस्टनची.... मंदार, आशी, साज, रिमझिम. मग कमीत कमी एकातरी महानुभावाची उपस्थिती राहिल असा सुज्ञ (!) विचार करुन ह्यूस्टन नक्की केलं हो!

तर हे असं ए.वे.ए.ठि. जाहिर होताच टेक्सासवर पोस्टांचा हलकासा पाऊस सुरु झाला. आशी आणि मंदारनं ही कल्पना लगेच उचलून धरली तसा थोडा धीर आला. बाफवर चविष्ट (आणि पाणचट!) गप्पांना ऊत आला. मी आणि मंदारनं प्रस्तुत केलेला चमचमीत जेवणाचा बेत आशीनं माझ्या अल्सरचं निमित्त करुन असा काही हाणून पाडला की ज्याचं नाव ते. त्याच वेळी आशी मुगाच्या खिचडीचा कट करते आहे असं दिसताच मी जोरदार विरोध करुन त्या 'कटा'ची आमटी करुन टाकली. माझ्या भाकरीच्या फर्माईशीला आशीनं ती कोकणात कशी एका दिवसात ५० भाकर्‍या करते याचं रसभरीत उत्तर दिल्यानं, ए.वे.ए.ठि. च्या दिवशीच्या एकंदरीत प्रतिकूल घटनांचा ल्.सा.वि. काढूनही माझ्या वाट्याला २ तरी भाकर्‍या येतील अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत करुन घेतली. समजूतच म्हणा ती. ऊसगावात भाकरी पहायचंही नशीबात नसलं तर खायच्या गोष्टी करुन काय उपयोग, हे माझ्या 'भाबड्या' मनाला कसलं समजतंय! असो. मंदारच्या डोक्यावर पुरणपोळीचा भार टाकायचा मी आणि सचिनने प्रयत्न करताच असा काही गायब झाला की स्वारी दुसर्‍या दिवशीच 'सुप्रभाता'ला उगवली!

या पु.पो. च्या (पु.पु.च्या नव्हे! संबंधितांनी गैरजमज करुन घेऊ नये) आणि मुगाच्या गरमागरम चर्चेवर मुग गिळून गप्प बसतिल ते मा.बो.कर कसले. तर या ही चर्चेत वेळोवेळी तेल आणि कधी कधी पाणीही ओतण्याचे महान कार्य सचिन, रुनी, उपास यांनी यथासांग पार पाडले.

होता होता शुक्रवार उजाडला. पण इच्छूकांचा आकडा काही पुढे सरकेना... मी, आशी आणि मंदार. सीमाचं लवकरच देशात सुट्टीवर जायचं घाटत असल्याचं तिनं मला ई-पत्रातून कळवलं तेव्हा तिला ए.वे.ए.ठि. ला उपस्थित रहाण्याच्या माझ्या आग्रहावर 'सीमा' आल्याचं मला जाणवलं आणि एक उपस्थित गळाला. राहाता राहीले रिमझिम आणि साज. रिमझिमची परिक्षा सुरु असल्याने तशीही तिची बाफवरची पोस्टांची उपस्थिती मूसळधारहून 'रिमझिम्'पर्यंतच सिमीत झाली होती. साजचं कन्यारत्न 'ईशानी' हिच्या तब्येतीच्या तक्रारी चालू असल्याने ती सुद्धा साशंकच होती. पण मंदार आणि आशी त्यांच्या ऊपस्थितीबद्दल बरेच ठाम असल्याने मी अजूनही आशावादी होतो.

तर मंडळी, अशाप्रकारे शनिवारी पहाटे ६ वाजता निघून मी आणि माझा मित्र भूषण ११-१२ वाजेपर्यंत ह्यूस्टनला पोहोचायचं असं ठरलं. 'ठरलं एकदाचं' असं म्हणा हवं तर!

पहाटे ५ चा गजर घड्याळात लावून मी झोपलो खरं पण उशिरापर्यंत झोपण्याची वाईट सवय ईथेही आडवी आली. पहाटे बराचवेळ आकांडतांडव करून घड्याळाच्या गजराने आमच्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि बिचारा शांत झाला. ईकडे माझे डोळे 'भल्या पहाटे' ७ वाजताच ऊघडले आणि शॉक लागल्यासारखा मी बिछान्यातून टुनकन ऊडालो. तिकडे भूषणमहोदयांचीही अशीच काहिशी अवस्था होती. शेवटी ८ वाजता धावत पळत तयार होत ह्यूस्टनच्या दिशेने प्रस्थान ठेवले...... बाहेर थंड हवा, ढगाळ वातावरण आणि गाडीमधे आदल्या रात्री नव्यानेच बनवलेल्या सीडीमधली वाजणारी सुमधूर गाणी यामूळे मन कसं एकदम उत्साही होतं.

तर मंडळी, अशा प्रकारे गाणी ऐकत, गप्पा मारत आमचा प्रवास गटगच्या दिशेने पुढे सरकत होता!

आदल्या दिवशी फोनवरील संभाषण अर्धवट सोडून पळालेल्या मंदारला साधारणतः सकाळी १० वाजता जाग आली म्हणून की काय, माझा भ्रमणध्वनी किणकिणला आणि मंदारभाव फोनवर अवतरले. घरातल्या पाहूण्यांचे कारण पूढे करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आमचे प्रवासाचे हालहवाल जाणून घेऊन स्वारी गायबली.

मस्त रमत गमत, गप्पा मारत, रस्ता चुकत, गाणी ऐकत आम्ही ह्यूस्टनजवळ येऊन पोहोचलो तसं आधी ठरवल्याप्रमाणे आशीला फोन केला. पण ४-५ वेळा प्रयत्न करुनही उत्तर काही मिळेना तेव्हा 'अजून एक मेंबरानं डच्चू दिला की काय' अशी शंका मनात चमकून गेली. पण सुदैवाने, घरच्या फोनऐवजी भ्रमणध्वनीवर प्रयत्न केल्यावर फोन उचलला गेला आणि...........आशी तिकडून 'आशी'काही बरसली कि बस्स्...ती म्हणे माझा फोन सकाळपासून ट्राय करत होती आणि मीच उचलत नव्हतो. तिने 'आवाजी संदेश'ही ठेवला होता म्हणे माझ्यासाठी. पण माझ्या भ्रमणध्वनीतून तर कसलाच आवाज आला नव्हता. तेव्हा तिच्याकडून माझा भ्रमणध्वनी क्रमांक वदवून घेतल्यावर खरी 'ग्यानबाची मेख' माझ्या ध्यानात आली. अस्मादिकांनी घाईघाईत 'ध' चा 'मा' केला होता. क्रमांकामध्ये ५ च्या ऐवजी २ लिहिण्याची एक 'लहान'शी चूक आम्हाला भोवली होती. असं हसायचं नाही काही मंडळी, चूक माणसाकडुनच होते ना? (बाईमाणसाकडून चूक होते असे म्हणण्याची हिंमत अजून तरी माझ्यात आलेली नाहिये!)

पण तशाही परिस्थित कोणा पामराच्या फोनच्या 'आवाजी संदेशात' आशीने 'आवाज' काढला असेल आणि तो ऐकून सदर व्यक्तिचा चेहरा कसा पहाण्यालायक झाला असेल याची कल्पना करुन येणारे हसू मी महत्प्रयासाने आवरले. तो पर्यंत आशीबाई बर्‍याच शांत झाल्या होत्या. त्या त्यावेळी स.कु.स्.प. बँकेत गेल्याचे कळल्याने तिकडेच भेटून पुढच्या योजना ठरवूयात असे ठरले म्हणून आम्ही बँकेच्या दिशेने निघालो. मधल्या वेळात मी साज ला बर्‍याचवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन सरळ सरळ बंद होता! त्यामूळे 'साज काही येत नाही आज' असे वाटले.

ठरल्याप्रमाणे येऊन पोहोचलो आणि त्या नंतर दोनच मिनिटांत आशी, त्यांचे उत्तमार्धांग श्रीयुत आशिष आणि सुपुत्र 'अर्णव' यांचे आगमन झाले. मला तेवढ्या वेळात जरा फिरकी घ्यावी असे वाटून गेले म्हणून भूषण ला 'अविकुमार' बनण्यास सांगून मी स्वतः 'भूषण' बनलो. त्या प्रमाणे आम्ही आमच्या ओळखी करुन दिल्या. त्यामूळे माझ्याकडे पुर्णतः दूर्लक्ष करुन आशी भूषणलाच मंदार आणि बाकी सगळ्यांबद्दल विचारायला लागली. थोड्याच वेळात भूषण साहेबांना ते नाटक वठवणे अवघड जाऊ लागले आणि मग मी 'कशी गम्मत केली'च्या 'अवि'र्भावात खर्‍या अविची (म्हणजे अस्कादिकांची हो मंडळी!) ओळख करुन दिली. आशिषला आम्ही खरे तर पहिल्यांदाच भेटत होतो पण तरिही त्याच्या लाघवी आणि मोकळ्या स्वभावामूळे आम्ही सगळे खूप पुर्वीपासूनची ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारायला लागलो.

आता मुख्य काम होते ते मंदारशी कुठे आणी कसे भेटायचे ते ठरवणे. त्या प्रमाणे मंदारला फोन केला तर पठ्ठ्याने रिमझिमलाही फोनवर घेतले होते. ती सुद्धा सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक होती आणि परिक्षा असूनही वेळात वेळ काढून येता येतं का ते पहात होती. फक्त तिचे घर सर्वात दूर असल्याने कोणतेतरी मध्यवर्ती ठिकाण ठरवावे लागणार होते. हे ऐकूण मला आणखी हूरुप आला. आणखी एक मेंबर वाढला की हो मंडळी! आता फक्त साज राहिली होती. मी पुन्हा तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण.. व्यर्थ.

दरम्यान चि. अर्णव आम्ही उभे असलेल्या दुकानाच्या स्वयंचलित दरवाजाची कार्यक्षमता वारंवार तपासून पहात असल्याचे आशिषच्या लक्षात आल्याने इथून लवकरच काढता पाय घ्यावा असे त्याने आम्हाला सूचवले. एव्हाना सर्वानुमते असे ठरले होते की, मी, भूषण, आशी, आशिष आणि मंदार आधी कोणत्या तरी 'हाटिलात' भेटून दूपारचे भोजन उरकून घ्यावे आणि मगच रिमझिमला भेटायला एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जावे. त्या नुसार आम्ही 'क्ले पॉट' नामक हाटिलाकडे मोर्चा वळवला. मंदारला यायला थोडा वेल होता. चि. अर्णवला भूक लागली असल्याने त्याला आधी भोजन करवले पाहीजे या हेतूने मंदारची वाट पहात बाहेर थांबलेले आम्ही सर्व आतमध्ये गेलो खरे, पण आतल्या पदार्थांच्या घमघमाटाने आमच्या पोटातल्या उंदरांच्या उड्यांचं अनुक्रमे कावळ्याच्या कावकावमध्ये आणि लगेच वाघाच्या डरकाळ्यांमधे रुपांतर झाले. मंदार तर अजूनही आला नव्हता. पण तितक्यात.. आशिषला एक नामी युक्ती सुचली बरं का मंडळी!..मंदार येईपर्यंत आपण फक्त स्टार्टर्स चालू करुयात म्हणजे मेन कोर्स चल्लू न केल्याने योग्य ते औचित्य साधले जाईल! .....आणि मग...पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही स्टार्टर्सवर तुटून पडलो!

यथावकाश म्हणजे ५ मिनिटांतच मंदार आणि त्यांचे उत्तमार्धांग सौ.अपर्णा यांचे आगमन झाले. आम्ही 'नामांतराची' नेहमीची यशस्वी युक्ति मंदारवर आजमावण्याचा प्रयत्न केला पण... पण तो साफ अयशस्वी ठरला. मंदारने मला बरोब्बर ओळखले. मी कधी काळी माझा 'फोटू' मा.बो. वर लावला होता तो पाहिल्याचे त्याला पूसटसे आठवत होते म्हणे!

मग काय...जेवणाबरोबरच गप्पांना उधाण आले. मंदार पूर्वी बा.रा.च्या ए.वि.ए.ठि.ला हजर असल्याचे कळले. साहजिकच गप्पांचा रोख झक्की, विनय, मृ. ई. कडे वळून आला. तसेच बोलण्याच्या ओघात उपस्थित बरेच जण हे 'विशिष्ठ शहरातले' किंवा जिल्ह्यातले असल्याचे स्पष्ट झाले. मधेच मंदारला पु.पो.ची आठवण करुन दिल्यावर 'करुण' चेहर्‍याने' आणि पु.पु. बाण्याने त्याचे उत्तमार्धांग आजूबाजूला नाही याची खात्री करुन घेत, ती फर्माईश थेट सौ. अपर्णाकडेच करण्याचा 'भयानक' प्रेमळ सल्ला दिला. स्वतःचा जीव वाचवून माझा जीव धोक्यात घालण्याचे मंदारचे कॄत्य मला बिलकूल रुचले नाही आणि म्हणूनच मी 'मला पु.पो. फारशी आवडत नाही' असे सांगून कशीबशी वेळ मारुन नेली. स्वतः मरण्यापेक्षा वेळ मारलेली बरी... नाही का हो मंडळी! मधेच मंदारने त्याला मिळणार्‍या सुट्ट्या या विषयाचे गोडवे गाऊन सगळ्यांची गोड खीर आंबट करुन टाकली. आणि बदल्यात तीळ - पापडही खाऊ घातले.

गप्पा मारता मारता असेही कळले की, मी आणि मंदार दोघेही अजून महिनाभरात एकाचवेळी पुण्यात असू. तेव्हा पु.पु.बरोबरही एक ए.वे.ए.ठि. करता येईल. याबाबतीत मंदार थोडा साशंक होता.त्याचं म्हणनं पदलं की आपण काय झक्कीकाकांसारखे उत्सवमूर्ती (पक्षि सेलिब्रेटी) थोडेच आहोत? पण मी बराच सकारात्मक होतो... अजुनपर्यंतचा अनुभव आणि काय... म्ह्टलं बघु...आले तर ठीक नाही तर......आपण दोघे आहोतच की.. दोघांचेच ए.वे.ए.ठि. करुन टाकू... हा.का. ना. का.!

गप्पांच्या नादात जेवण जरा (?) जास्तच झाले. साधारणतः दुपारचे ३ आणि पोटाचे १२ वाजत आले होते. म्हणून मग पुढचा कार्यक्रम ठरविण्यासाठी मंदारने रिमझिमला फोन लावला. मग मी पण साजला पुन्हा संपर्क करण्याचा प्रायास करुन पाहिला. आणि..... अहो आश्चर्यम! फोन चक्क दस्तुरखुद्द साजने उचलला. चुकीचा फोन नंबर दिल्यामुळे आशीने दिलेला आहेर मी साभार साज पर्यंत पोहोचवून टाकला. तिच्याकडून कळले की कन्यारत्नाची तब्येत अजूनही नरमच असल्याने तिचे येणे अवघड आहे. तरिही, रिमझिमला भेटण्यापूर्वी एकदा साजकडे जाऊन यावे असे ठरल्याने आम्ही आधी आशीच्या घरी आणि नंतर साजकडे जायचे नक्की केले. खाणावळीचे सर्व बिल आमच्या आग्रहाला न जुमानता आशिष ने देऊन टाकले आणि आमचा मोर्चा आशीच्या घरी जाऊन विसावला.

आता आशिष , मंदार, आणि अपर्णा यांना चहाची चांगलीच तल्लफ आली होती. त्यामूळे वेळ वाचवण्यासाठी साजकडे गप्पा मारता मारता चहाची फर्माईश करण्याचे ठरले आणि आम्ही निघायची तयारी केली. पण सगळेजण आपल्या घरी आले आणि काहीही न घेता निघाले हे आशिषच्या मनाला पटेना. त्यामुळे मग नाईलाजाने (!!!) आशीने अल्पोपहार पेश केला पण सगळ्यांची पोटं तुडुंब भरली असल्याने आशिषचे मन राखण्यासाठी म्हणून थोडंसं काहिबाही पोटात ढकलून सगळे जण साज कडे निघालो.

साजचं अपार्टमेंट म्हणजे एक मोठा भूलभूलैयाच होतं. किंवा अली बाबाची गुहा म्हणा. लहानपणीच्या चोरपोलिस (वेगवेगळ्या खूणा ओळखून चोर पकडणे) खेळाची तीव्रतेने आठवण झाली. चालत चालत एका बोळातून दुसर्‍या बोळात घर शोधताना सगळ्यांनाच मजा यायला लागली होती. मला एखादं म्यूझियम पहात असल्याचा भास झाला. एका ठिकाणी तुरुंगाला असतात तसे उभे बार लावले होते आणि त्या बारकडे जाणारा बाण दाखवून घरावी दिशा प्रदर्शित केली होती. आत या बारमधून कसं जायचं असा प्रश्न मंदारच्या बालसूलभ बुद्धीला न पडतो तरच नवल! पण तेवढ्यात मी दुसरा रस्ता शोधून काढला म्हणून बरं नाही तर मंदारच्या आग्रहाखातिर त्या बार मधून मधून जाव लागलं असतं सगळ्यांना. सगळे जण गेलेही असते हो बारमधून आरामात, पण मला माझ्याच बाबतीत शंका असल्याने मी पटकन दूसरा रस्ता शोधण्यावर भर दिला होता. असो. करता करता शेवटी शेवटच्या बोळात येऊन पोहचलो. तर मंदारची बालसुलभ बुद्धी परत जागृत! "शेवटच्या बाणापर्यंत पोहोचल्यावर 'कसं फसवलं' असं लिहिलेलं आढळलं तर काय?". मी आपलं असोशीनं तिकडं दुर्लक्ष करत (खरं तर मनातल्या मनात हसू आवरत) पुढे झालो.

दरवाजावर आवाज केल्यावर दरवाजा एका लहानशा मुलीनं उघडला. मनात म्हटलं की, अरे साजची मुलगी बरीच मोठी आहे की!. पण मग हिच 'साज' असं समजल्यावर 'मुग' गिळून गप्प बसलो. सगळी कंपनी घरात स्थिरस्थावर झाल्यावर 'ओळखा पाहू कोण आम्ही?' हा खेळ खेळण्यात आला. राज्य अर्थातच साजवर होतं. पण साजनं जवळजवळ सगळ्यांना बरोब्बर ओळखलं... सगळे जण बसलेच होते तसे..... जवळजवळ!!! मला तर साजनं आरामात ओळखलं कारण तीने माझ्या ऑर्कूटवरच्या प्रोफाईलला आधीच भेट देऊन ठेवली होती. अस्सं आहे होय ते.. बऽऽरं बऽऽरं....!!!

आधी ठरवल्याप्रमाणे साजला चहाची फर्माईश केली तिने सगळ्यांना खीर खाण्याचा प्रेमळ आग्रह केला. आम्ही तो आग्रह आमच्या तुडूंब भरलेल्या पोटांच्या काळजीने साभार परतवून लावला. आणि रिमझिमकडे जायला उशिरही होत असल्याने जरा घाई करावी लागणार होती. तेवढ्यातच साजचे उत्तमार्धांग श्रीयुत परागचे आगमन झाले. सगळ्यांशी ओळखी करुन घेत परागही गप्पांमधे मिसळून गेला. पण आशिष आणि मंदारला चहाची तल्लफ काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती.... म्हणून पुन्हा चहाचा आग्रह्....त्यावर साजचा पुन्हा खिरीचा आग्रह....त्यावर पुन्हा सगळ्यांचा साभार नकार.. पुन्हा रिमझिमसाठी घाई...!!
शेवटी रिमझिमला भेटल्यावरच चहा घेऊ असं ठरलं. पराग आणि साज यांनी चर्चा करुन आमच्याबरोबर यायचा अनपेक्षित आणि आनंददायक निर्णय घेतला आणि साज कु. ईशानीची आवराआवर करायला पळाली. आवराआवरी करुन १०-१५ मि. मध्ये आम्ही सगळे निघालो... बरोबर चहासाठी तरसलेले अतृप्त आत्मे घेऊनच!!!

साजच्या या खिरीच्या आग्रहाचे कारण दुसर्‍या दिवशी तिच्याशी फोनवर बोलताना कळाले. सगळे जण घरी येणार म्हणून तीने मोठ्या कष्टाने घाऊक प्रमाणात अवघ्या अर्ध्या तासात खीर बनवून ठेवली होती. आणि कोणीच त्या खीरीची चवही न चाखल्याने आता पुढील काही दिवस पराग आणि साजला ती खीर गोड मानून घ्यावी लागणार होती.

तर मंडळी, अशाप्रकारे १००% ह्युस्टनवासी मा.बो.करांची उपस्थिती अगदी अनपेक्षितरित्या पक्की झाली!

ठरल्याप्रमाणे सगळा मोर्चा पुर्वनिश्चित ठिकाणी पोहोचला आणि लवकरच रिमझिमचे त्यांचे उत्तमार्धांग श्रीयुत शैलेश आणि कन्यारत्न कु. वेधा यांच्यासह आगमन झाले. आणि मग तिच्या अपर्णा आणि मंदारशी गप्पा सुरु झाल्या. आम्हीपण तोपर्यंत शैलेशशी ओळख करुन घेऊन गप्पा मारायला लागलो. पण रिमझिमसाठी मात्र आम्ही जणू त्या गावचेच नव्हतो. मग आम्ही सगळे 'ला मेडलीन' नामक फ्रेंच हाटिलात गेलो. तिथे बराच वेळांनंतर सगळ्यांशी गप्पा झाल्यावर आणि आम्हाला बर्‍यापैकी अनुल्लेखाने मारुन झाल्यावर रिमझिमला आम्हा आगंतुकांची आठवण झाली आणि मग माझ्याकडे आणि भूषणकडे पाहून शेवटी बाईंसाहेबांनी प्रश्न विचारला....'तुमच्या पैकी अविकुमार कोण?' मी शांतपणे भूषणकडे बोट दाखवले. तर बाईसाहेब फक्त 'अच्छा अच्छा' म्हणून गप्प! मग म्ह्टले जाऊदे आपणच ओळख करुन देऊ आणि पुन्हा नव्याने करी ओळख करुन दिली तरी बाईसाहेब पुन्हा... 'अच्छा अच्छा' म्हणून गप्प! मग आम्हाला पुन्हा 'मूग' गिळावे लागले.

थोड्यावेळातच सगळे स्थानापन्न झाले आणि मग मात्र गप्पा टप्पा, खान्-पान जोरात चाली झाले. कु. वेधा ही मायबोलीची टोपी घालून आल्यानं 'वेधा' हिच एकमेव अधिकृत मायबोलीकर हजर असल्याचं आशिषचं मत पडलं! सगळ्यांचं खान्-पान चालू असताना मी आणि भूषण मात्र फक्त 'आंब्याचा चहा' मागवून स्वस्थ बसलो होतो. पण सगळ्यांचं खाणं संपलं तरिही आम्हाला काही 'आंबा चहा'चं दर्शन झालं नाही. यांनी खास रत्नागिरीहून आंबा आणि आसाम मधून चहा मागवलाय की काय इतपत शंका आल्यामूळे चौकशी केल्यावर असे निष्पन्न झाले की 'आंबा चहा' नामक प्रकार आपण स्वतःच मशिन मधून (गाळून?) आणायचा. भूषणने 'टी' जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि दोन ग्लास भरुन चॉकलेटी रंगाचा आंबा चहा घेऊन आला. आम्ही मोठ्या आशीनं.. आपलं.. आशेनं पहीला घोट घेतला आणि भूषणनं पठ्ठ्यानं 'आंबा चहा' ऐवजी 'कारला चहा' आणला की काय अशी 'टी'व्र शंका येऊन गेली. शेवटी दुसरा घोट न घेता त्या चहाला मी आणि भूषणनं अनुल्लेखानं मारलं!

रिमझिम ही उपस्थितांमधील सर्वात सिनिअर मायबोलीकर असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. मी या सन्मानासाठी फक्त काही आठवडे कमी पडलो. पण माझे मा. बो. चे नोंदणी करण्यापुर्वीचे रोमातले महिने धरुन तो सन्मान मनातल्या मनात स्वतःला देऊन टाकला.... !!! तर अशा प्रकारे बर्‍याच जिव्हाळ्याच्या गप्पा, खानं-पिनं होऊन सर्वांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मी आणि भूषण आशीबरोबर तिच्या घरी रात्रीच्या मुक्कामाला पोहोचलो.

दिवसभराच्या दगदगीनंतरही आशीनं थोड्याच वेळात स्वादिष्ट स्वयंपाकाचा जंगी बेत केला. आणि तोही अगदी थोड्याच वेळात. त्यातही मूगाचे वरण बनवून तिने अप्रत्यक्षरित्या मला मूग खाऊ घालण्याचा मनसूबा तडीस नेला. आशिष तर काय...रसिक माणूस.. त्यामुळे जेवणाचा बेत साग्रसंगीत आणि हसत खिदळत पार पडला. रात्री उशिरा कधी तरी १२-१२:३० वाजता निद्रादेवीच्या आधिन झालो. दुसर्‍या दिवशी सकाळी आशीने बनवलेले चमचमीत चहा-पोहे खाऊन आणि आशि-आशिष्-अर्णवचा प्रेमळ निरोप घेऊन परतीच्या रस्त्याला लागलो.

जसजसं ह्युस्टन मागे पडत होतं तसतसे मनातले आठवणींचे तरंग अधिकाधिक गहिरे होत होते. टेक्सासबाफ ला आम्ही सगळे श्रावणबाफ म्हणतो. श्रावणात जसे 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असतं, तसंच टेक्सासबाफवर कधी पोस्टांचा पाऊस तर कधी मंदारची 'सुप्रभाति' पोस्ट सोडून काहीच नाही, असा श्रावणी ऊनपावसाचा खेळ चालू असतो. म्हणूनच ए.वे.ए.ठि. ला 'मेंबरां'च्या उपस्थितीचा दुष्काळ जाणवण्याची शक्यता गृहित धरुन निघलेला मी, टेक्सासकरांच्या अविश्वसनीय प्रतिसादाच्या, आदरातिथ्याच्या, अवखळपणाच्या, अगत्यशीलतेच्या अशा अगणित आठवणी मनात साठवूनच परतीच्या प्रवासाला लागलो होतो......

Tuesday, May 12, 2009

कितीदा....?

वेदनांच्या सरणावरती, मी जळलो कितीदा
संवेदनांना तुझ्या तरी, मी कळलो कितीदा?


प्रेमविरोधी दळण दळले आजवरी, पण हरलो
बघता बघता जात्यामध्ये, मी आदळलो कितीदा


मनमोहक तुझ्या अदांवरी, भाळलो नित्य असा
तोल दिलाचा जाता जाता, मी सांभाळलो कितीदा


जळलो, संपलो कधीचा, त्या प्रिती कटाक्षाने
नयनी तव सामावण्या, मी ’काजळ’लो कितीदा


संध्यावेळी वळलो तुजला, निरोप द्यायला जेव्हा
विरहाने तुझ्या सखे, बघ, मी मावळलो कितीदा

-- अविनाश