Wednesday, November 26, 2014

बरे वाटले....!


नकार-होकारावर कधीचे शब्दही होते अडले,
आसवांतून अखेर बोलून गेली... बरे वाटले....!


सव्वा रुपया, चार फुले... अन् नारळही नाही!
स्वस्तामधला सौदा..."माऊली"!... बरे वाटले...!


घाव केले हृदयावर त्यांनी... शब्दांचेच होते,
कट्यार नव्हती बगलेखाली... बरे वाटले....!


दारामध्ये ताटळलो कधीचे दोघे आम्ही,
श्वानाला तरी त्या भाकरी मिळाली... बरे वाटले...!


फुलली 'कमळ'दले अशी 'शरदा'त अचानक...
जादू कोणती रातोरात झाली?... बरे वाटले....!


असह्य होते शिवार जळते एकट्यानेच पहाणे,
मृत्यो!..तव साथ मिळाली....बरे वाटले...!


दुध-दह्याच्या अभिषेकांची 'सावळी' पाऊले,
आज माझ्या आसवांनीच न्हाली... बरे वाटले...!


नुसतेच पाहतो व्यवहार जगाचे 'अवि' उघड्या डोळा,
खदखद फक्त कवितेत निघाली...बरे वाटले...!


- अविनाश

Thursday, October 09, 2014

हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही.

कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!


तर सर्वप्रथम कथा. पुस्तकाची कथा ठिकठाक म्हणावी इतपत बरी आहे. पण कित्येक ठिकाणी प्रसंग-मांडणी मनावर पकडच घेत नाही.पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी. त्यामूळे थोडक्यात एखादा प्रसंग मांडून तो फुलवायच्या आधीच 'कट' म्हणायची घाई झालेल्या डायरेक्टरप्रमाणे प्रसंग संपतोही.


नायकाचे पात्र बर्‍याच ठिकाणी निर्बुद्ध आहे की काय असे वाटण्याइतपत अपरिपक्व दाखविले आहे. त्यात कॉलेजातले प्रेम, नायिकेला मिळवण्यासाठी नायकाची धडपड ई. तेच ते प्रसंग 2 states मध्ये उत्तम रितीने फुलवलेले असल्याने इथे गुंडाळल्यासारखे आणि काही वेळेस चक्क कंटाळवाणे वाटतात.
फक्त पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी आपण वाचत रहातो.

जिथे नायक नायिकांचीच पात्रे मनावर पकड घेऊ शकत नाहीत तिथे बाकी पात्रांविषयी काय बोलणार. पुस्तकातला रोमांसही तोचतोचपणा (आधिच्या पुस्तकातील) आल्यामूळे फारसा प्रभावी, उत्कट न वाटता उथळ वाटत रहातो.

तसे पहायला गेले तर काय नाही या 'स्क्रिप्ट' मध्ये. एक गंगाकिनारेवाला गरिब बिहारी गाव का छोरा, शिकण्यासाठी (?) दिल्लीतल्या कालेजात, नायिका एक बिगडे बडे बाप की 'थोडीशी' बिगडी लडकी. प्रेम, विरह, गाव आणि तिथले राजकारण, राजकुमार आणि राणीमाँ, बॉलीवूडछाप धक्का तंत्र, बिछडना आणि मिलना, प्रणय, पाठलाग, परदेशातले सिन्स ई.ई. फक्त ते प्रसंग 'फुलवायला' चेतनभाऊ कमी पडलेत.


वाचणार्‍यांचा उत्साह टिकून रहावा म्हणून इथे मुद्दामच कथेबद्दल जास्त लिहीले नाही.


तर...लोक पुस्तक वाचतील? चेतन भगतचे पंखे नक्कीच वाचतील (मी नाही का वाचले?). आणि इतर लोक कालांतराने सिनेमा पहातीलच की!

Wednesday, May 08, 2013

आजही...!


आजही...!

आजही...!

आपलेच आहेत ते ज्यांनी केलेत वार आजही
शब्द जयांचे घुसलेत हृदयात आरपार आजही

काय सांगू बरेवाईट तुझे, आज मी तुजला?
राहिला का तोच माझा अधिकार.... आजही?

समुद्राएवढी आहे की, आभाळाएवढी नक्की?
उमगत नाही मज या वेदनेचा आकार आजही

काय अप्रुप त्या धनाचे वाटणार सांगा?
'तोच' आहे मी तसाच निर्विकार आजही

विरुन गेली सर्व सुखे जरी गोड स्वप्नांपरी
त्या स्वप्नांचा मनात भरला बाजार आजही

सावलीही आज तुझी, 'अवी', साथ सोडू पाहते...
सोबतीला परी, 'तो', निर्गुण निराकार आजही...!

          ---- अविनाश पेठकर

Thursday, February 21, 2013

समाधान!

१९९७ साली, १० वी नंतर स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणी आता आपण कॉलेज कुमार झालो या भावनेने पोटामध्ये गुदगुल्या व्हायला लागल्या.

स. प. विद्यालयात दोनच वर्ष होतो मी, पण माझ्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत स. प. महविद्यालयाचा प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष असा फार मोलाचा वाटा आहे.

मी आणि माझा मित्र सुशांत दोघेही मध्यमवर्गीय घरांमधुन. म्हणजे खिशामधे एक बसचा पास आणि ५ किंवा १० रुपये जास्तीत जास्त. दोघेही स. प. कॅंटीनमधे दुपारी डबा खाण्यासाठी जमत असु. पण डबा खाता खाता कँटीनमधे दरवळणारा विविध पदार्थांचा सुवास आम्हाला आशाळभुतासारखा इतरांच्या ताटाकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडायचा. आपणही काहितरी घ्यावे असं खुप वाटायचं... पण ऐपतच नाही तर काय करणार! यावर आम्ही दोघांनी एक उपाय शोधुन काढला. आम्हाला कळलं की तिथे एक वाटी सांबार एक रुपयाला मिळतं. मग काय, रोज आळीपाळीनं मी आणि सुशांत एक वाटी सांबार मागवायचो आणी डब्यातली चपाती त्यात थोडी थोडी बुडवुन दोघे खायचो. काय स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद असायचा त्यात. (तुम्ही हसताय!...पण एक वाटी सांबारकी किमत तुम क्या जानो रमेशबाबू!!!) तसं ते सांबारही तितकंच स्वादिष्ट होतं.. किमान आमच्यासाठी तरी. दोनतीन महिन्यांतून एकदा एक 'बनवडा' घ्यायचो आणि तो दोघांत अर्धाअर्धा खायचो. त्या दिवशी आनंदाने दिवसभर आमची गाडी हवेत असायची.

अजुनही सुशांत, मी आणी आमच्या बायका (बायकोचं अनेकवचन 'बायका'च ना वो?) ते दिवस आठवून खुप हसतो आणी जुन्या आठवणींमध्ये बुडून जातो.

खरे तर स. प. महाविद्यालयाच्या बाहेर असलेलं S.S. Canteen हेच कॉलेज कँटीन नावाला साजेसं होतं. तिथं असलेल्या so called modern ललनांकडे पाहुन आम्ही दोघंही अचंबित व्हायचो. आणी दोघेही त्यांच्या नावाने शंख करायचो. काय करणार्..कोल्ह्याला द्राक्षे आंबट!.. हडपसरचा बस स्टॉप निलायम चौकात असल्याने आम्हाला रोज S. S. समोरुनच जावे लागायचे आणी खिसे चाचपुन कधी कधी गाडी आतमधेही वळायची आमची. त्यावेळी कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त कसं हादडता येईल याचं गणित चालायचं डोक्यात. एकदा हे गणित कायमचंच सोडवलं आम्ही दोघांनी मिळुन. S S मध्ये 'समोसा-पाव' नावाचा प्रकार मिळत असे. त्यासोबत चिंचेची आंबट-गोड चटणी आणि तळलेल्या मिरच्या आपल्या हातानेच घ्यायच्या असा शिरस्ता होता. मग काय, आम्ही भरपुर चटणी ताटात वाढून घ्यायचो आणी पावातून समोसा बाजुला काढुन ठेवून फक्त मिरची आणि पावाबरोबर सगळी चटणी सफाचट करायचो. त्यानंतर मग पुन्हा जाउन चटणी आणायची आणि या वेळी ती मिरची अन समोशाबरोबर खायची!!! तर अशा रितीने एकाच पदार्थाच्या किमतीत दोन पदार्थ खाल्ल्याचे समाधान आम्ही मिळवत असू.

खिशात पैसे नसल्याची कसर आम्ही मनात भरपुर 'समाधान' भरुन घेउन भरुन काढायचो. मागे वळून पहाताना आता वाटतं, स्वतःच स्वतःच्या मनाला समजावनं खुप सोपं होतं तेव्हा. एक वाटी सांबारानं हॉटेलमधे जेवल्याचं समाधान.... भरपुर चटणी-मिरची खाउन पोट भरल्याचं समाधान.... मनातल्या मनात 'एखादी'वर जीव टाकुन प्रेमात पडल्याचं समाधान... कधी मधे J M Road आणि Ferguson Road वर चकरा मारुन आपणही मॉडर्न असल्याचं समाधान.... आणि असंच बरंच काही. मुळात आईवडिलांनी पोटाला चिमटा काढुन आपल्या शिक्षणासाठी केलेली खटपट पाहून आपोआपच जबाबदारीनं आलेलं शहाणपण असावं या समाधानामागं. वडिल दहावी तर आई चौथी पास..पण त्यांनी आपल्या मुलांसाठी पाहीलेलं स्वप्न आणि त्याच्या पूर्ततेसाठी केलेली परिस्थितीशी लढाई हे नेहमीच आम्हा मुलांसाठी प्रेरणादायी होतं. आजही आई जेव्हा "माझी तीनही मुलं 'साप्टेर इंजीनर' आहेत" असं अभिमानानं सांगते तेव्हा, आईवडिलांच्या अपे़क्षांना आपण खरं उतरु शकलो या जाणीवेनं मिळणारं समाधान हे खरंच खुप मोलाचं असतं...'अलौकीक' असतं.

[मायबोली.कॉम येथे पूर्वप्रकाशित    http://www.maayboli.com/node/1869  ]